आलापल्लीतील घटना : पोलीसही वीर बाबुराव चौकात दाखलआलापल्ली : येथील वीर बाबुराव चौकात एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड येथून लोहखनिजाचा कच्चा माल घेऊन जाणारे तीन ट्रक काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडवून ठेवले. त्यामुळे येथे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. काँग्रेसचे नेते मुस्ताक हकीम आणि चंदू बेझलवार यांना सुरजागड पहाडीवरून कच्चे खनिज घेऊन जाणारे तीन ट्रक निघाले आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार ग्रा.पं. सदस्य सलीम शेख, गणेश आत्राम, शब्बीर शेख, संतराम वरणे आदीसह अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी वीर बाबुराव चौकात ठाण मांडले होते. सायंकाळी ६.४५ वाजता येथे एपी ०४ एक्स ७४९२, एमएच ३४ एबी ४६१२, एमएच ३४ एबी ९८७ क्रमांकाचे तीन ट्रक आले. यात माती मिश्रीत दगड असल्याचे आढळून आले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ट्रकला पुढे जाण्यास मज्जाव केला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरिक्षक नीलेश सोंळके, पोलीस उपनिरिक्षक दीडवाघ हे घटनास्थळी दाखल झाले. अहेरीच्या तहसीलदारांना याबाबत सूचना देण्यात आली व पुढील कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कच्चा माल नेणारे तीन ट्रक रोखले
By admin | Updated: April 14, 2016 01:34 IST