महेश पाटील यांचे प्रतिपादन : वैरागड येथे दारूबंदीचा ठराव पारितवैरागड : गावात दारूबंदी, व्यसनमुक्ती राबविण्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय पोलीस काहीच करू शकत नाही, असे प्रतिपादन आरमोरीचे पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी केले. दारू, सट्टा, जुगाराचे प्रमाण वाढत चालले आहे. याला आळा बसावा यासाठी महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या वतीने समाज मंदिरात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला तंमुचे सदस्य, गावकरी उपस्थित होते. अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नोटीस बजावून या सभेला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र हजर झाले नाही. या सभेदरम्यान गावात दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. बैठकीला वैरागडच्या सरपंच गौरी सोमनानी, उपसरपंच श्रीराम अहीरकर, तंमुस अध्यक्ष जगदिश पेंदाम, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, परसराम कुंभरे, डोनूजी कांबळे, संगीता मेश्राम, दिनकर लोथे, नलिनी आत्राम, जनबाई सोनवाने, सरीता धनकर, मंजुळा खोब्रागडे, मुक्तीपथचे संघटक पितांबर सुपारे, अल्का मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना महेश पाटील म्हणाले, अवैध दारू विक्रेत्यांना पोलिसांनी पकडल्यानंतर कायदेशीर कारवाई होण्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. अनेक साक्षीदार कोर्टात आपली साक्ष बदलवून टाकतात. त्यामुळे दारू विक्रेते मुक्त होता. सामाजिक सुरक्षा व स्वास्थ बिघडविणाऱ्या या व्यक्तींना सजा होत नाही. त्यांची आणखी हिंमत वाढून अवैध धद्यांना ऊत येते. पकडलेले दारू विक्रेते मोकाट सुटत असल्याने शेवटी पोलीसही निराश होतात. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दारू विक्रेत्यांना अद्दल घडविणे आवश्यक आहे. या सर्व कामात पोलिसांबरोबरच गावकऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले.
दारूबंदीसाठी गावाचे सहकार्य गरजेचे
By admin | Updated: April 10, 2017 01:02 IST