एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड येथे ५ जानेवारीपासून तीन दिवसीय ठाकूरदेव यात्रा पार पडली. यात्रेमध्ये जिल्ह्यातीलच नव्हे तर लागूनच असलेल्या बस्तर भागातील आदिवासी बांधवही मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. देवस्थान समिती, मुक्तिपथ व परिसरातील जनतेच्या प्रयत्नातून ही यात्रा शंभर टक्के दारू व तंबाखूमुक्त झाली. यासाठी इलाक्यातील ७२ गावांतील पदाधिकारी व स्वयंसेवकांनी सहकार्य केले आहे.
धार्मिक ठिकाणी कुणीही दारू किंवा खर्रा सेवन करून येऊ नये, यासाठी सुरजागड येथील यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी देवस्थान समिती व परिसरातील जनतेच्या सहकार्याने मुक्तिपथ अभियानातर्फे सलग तीन दिवस जनजागृती करण्यात आली. यात्रेच्या ठिकाणी बॅनर तसेच व्हिडिओ व्हॅनच्या माध्यमातून दारू व खर्रा सेवनाचे दुष्परिणाम सांगत सुव्यवस्थित यात्रा पार पाडण्यासाठी प्रयत्न केला गेला. मार्कंडा व चपराळा यात्रेप्रमाणेच सुरजागडची यात्रादेखील शंभर टक्के दारू व तंबाखूमुक्त करण्यात आली. यासाठी पारंपरिक इलाका समितीने ठराव घेऊन दारू व तंबाखूचे सेवन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविले होते. यात्रेदरम्यान दुकानातून तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची निवडसुद्धा करण्यात आली होती. यामुळे कोणीही खर्रा किंवा दारू पिऊन निदर्शनास आला नाही.
यात्रेदरम्यान सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद बंग, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक किशोर मलेवार, साईनाथ मोहुर्ले, डॉ. राकेश नागोसे, डॉ. कन्नाके, डॉ. मेश्राम, डॉ. नंदू मेश्राम, गणेश कोलगिरे, राकेश ढवळे यांनी भेट देऊन पारंपरिक गोटूल समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच यात्रेत फिरून दुकानांची तपासणी केली असता एकाही दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होताना दिसली नाही.