अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कार्यकर्त्यांच्या भरवशावर चालणारा पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्त्यांच्या सूचनांचे स्वागत केले जाते. पक्षाचे विचार घराघरांत पोहोचवून संघटन मजबूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यात परिवार संवाद कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्याचा प्रारंभ गुरुवारी अहेरी येथे करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्याध्यक्ष रूपाली चाकणकर, आ. धर्मरावबाबा आत्राम, तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र सामला, प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम आदींची उपस्थिती होती.
यावेळी ना. जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे मोठा झाला आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांशी संवाद साधायला अहेरी येथे आलाे आहाेत. धर्मरावबाबा आत्राम यांना दिल्ली येथे पाठवायचे आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे, असे पाटील म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली. हा लोकशाहीचा विजय आहे. गडचिरोली जिल्ह्यात लवकरच मोठी पोलीस भरती घेऊन जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
सुरजागड प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी गृहमंत्र्यांकडे केली. यावेळी भाजपचे सिरोंचा पं.स. सभापती मोडेम सत्ष्ट्रत्वायम, पं.स. सदस्य जमपन्ना दुर्गम, प्रभाकर शानगोंडा, मदनय्या मादेशी, तसेच मुलचेरा तालुक्यातील वेंगणूरचे ग्रामपंचायत सदस्य आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र अलोने यांनी केले.
(फाेटाे : कार्यक्रमात आदिवासींची पारंपरिक टाेपी आणि तिरकमान हाती घेतलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आ. धर्मरावबाबा आत्राम, भाग्यश्री आत्राम, शाहीन हकीम, ऋतुराज हलगेकर.)