जिल्हाभर लागवड : कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीकगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रबी हंगामामध्ये उडीद पिकाची लागवड केली जात असून या पिकाखालील क्षेत्र प्रत्येक वर्षी वाढत चालले आहे. यावर्षी जिल्हाभरात ४०० पेक्षा अधिक हेक्टरवर या पिकाची लागवड झाली आहे. उडीद व मूग या दोन्ही पिकांना अत्यंत कमी सिंचनाची गरज भासते. त्यामुळे बहुतांश शेतकरी धान पिकानंतर किंवा सोयाबिन पीक निघल्यानंतर त्याचबरोबर बोडी आटल्यानंतर उडीद व मूग या पिकाची लागवड करतात. जमिनीमध्ये थोड्याफार प्रमाणात असलेल्या ओलाव्याच्या भरवशावर सदर पीक निघते. उडीद व मूग या दोन्ही पिकांना मागील वर्षीपासून पाच हजारापेक्षा अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग इतर पिकांच्या तुलनेत या पिकाकडे विशेष आकर्षित झाला आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी या तालुक्यामध्ये उडीद व मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे धान पीक निघल्यानंतर जमीन पडिक राहण्याऐवजी या पिकाचे उत्पादन घेतले जात असल्याने शेतीचा खर्च काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर या पिकांसाठी जमिनीची नागरणी केल्यानंतर खरिपाच्या वेळी नागरणी करण्याचा खर्च कमी होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी या पिकांकडे वळला आहे. (नगर प्रतिनिधी)
उडीद पिकाला विशेष पसंती
By admin | Updated: November 28, 2015 02:40 IST