गडचिरोली : उशीरा झालेली पेरणी, रोगांचा प्रादुर्भाव व पावसाने दिलेला दगा यामुळे सोयाबीन पिकाचे पाहिजे त्या प्रमाणात पोषण झाले नाही. परिणामी सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत. त्याचबरोबर दाण्यांचा आकारही अत्यंत लहान असल्याने सोयाबीन उत्पादनात यावर्षी कमालीची घट होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतित आहे. १० वर्षापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाची अजिबात ओळख नव्हती. मात्र लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात या पिकाचे प्रचंड प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. त्याचबरोबर कोरडवाहू व हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेता येत असल्याने आजपर्यंत ज्या जमिनी सिंचनाची सुविधा नसल्याने पडीत होत्या. त्या जमिनीमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतल्या जाऊ लागले. यावर्षी जिल्ह्यात ३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. अगदी सुरूवातीलाच महिनाभर पाऊस पडला नाही. त्यामुळे सोयाबिनची पेरणी महिनाभराने उशीरा झाली. त्यानंतरही पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीनचे पीक करपायला लागले होते. पाण्याअभावी पीक कमजोर झाले व दमट वातावरण यामुळे प्रचंड प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झाल्याने झाडांना अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत. काही झाडांना तर एकही शेंग लागली नाही. दाणेसुद्धा पूर्णपणे परिपक्व झाले नसल्याने त्यांचा आकार अत्यंत लहान आहे. त्यामुळे एकरी एक ते दोन क्विंटल एवढेच उत्पादन होण्याची शक्यता आहे. एवढ्या उत्पादनात लागवडीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. मागील वर्षीही कापणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले होते.
सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटणार
By admin | Updated: October 18, 2014 23:24 IST