जनजागृती अभियान : जिल्हा अग्रणी बँकेच्या मार्फत कार्यक्रमाचे आयोजनगडचिरोली : वृद्धापकाळात श्रम करण्याची क्षमता कमी होते. मात्र औषधोपचार व इतर खर्च वाढतात. त्यामुळे वृद्धापकाळात एक निश्चित उत्पन्न मिळत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने केंद्र शासनाने सुरू केलेली अटल पेंशन योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी केले.जिल्हा अग्रणी बँकेच्या (बँक आॅफ इंडिया) मार्फतीने जनजागृती अभियानाचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात गुरूवारी करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक डी. के. सिलारे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. बारापात्रे, महाबँकेचे व्यवस्थापक सुंदरलाल सेता, विदर्भ ग्रामीण कोेकण बँकेचे व्यवस्थापक प्रभाकर बेले, स्टेट बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक तुषार मेश्राम, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र शासनाने अटल पेंशन योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, आधार नोंदणी, जनधन योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा महत्त्वाचा उद्देश नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. त्यामुळे या योजनेची माहिती ग्रामीण भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचून याचा लाभ त्यांना घेत यावा, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या बँक व्यवस्थापकांनी या योजनांबाबतची माहिती नागरिकांना दिली व त्याचे महत्त्व सुद्धा पटवून दिले. कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.पुढे मार्गदर्शन करताना मेहता म्हणाल्या की, जोपर्यंत नागरिकांना योजनांची माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्या योजना राबविणे कठिण होऊन बसते. त्यामुळे योजनांची माहिती सर्वसामान्य व गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. माहिती मिळाल्यास योजना राबविण्यास गती प्राप्त होते, असेही प्रतिपादन केले. महागाईचा विचार केला तर अटल पेंशनच्या माध्यमातून मिळणारा लाभ ४० वर्षानंतर कमीही असू शकतो. मात्र एक निश्चित उत्पन्न मिळत राहत असल्याने संबंधित व्यक्तीला वृद्धापकाळात अत्यंत मोलाची मदत होते. सामाजिक सुरक्षेच्या योजनांमध्ये आर्थिक विचारापेक्षा एक निश्चित उत्पन्न मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मेहता यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक डी. के. सिलारे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
वृद्धापकाळात सामाजिक सुरक्षेची गरज- संपदा मेहता
By admin | Updated: July 17, 2015 01:43 IST