गडचिरोली : हवाई सफरीचे स्वप्न प्रत्येकालाच असतं. पण योग येत नाही, तशी संधीही मिळत नाही. लहान वयात विमानात बसण्याची संधी मिळणं तसं नशीबच. पण, लोकमतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणाऱ्या 'संस्काराचे मोती' या उपक्रमाने गडचिरोलीतील वियाणी विद्या निकेतन कॉन्व्हेंट नवेगाव कॉम्प्लेक्स येथे शिकणाऱ्या आठवीच्या श्रेयस विलास खवड या विद्यार्थ्याला विमानाने दिल्ली गाठण्याची 'गुड न्यूज' दिली आहे. येत्या १0 जुलैला तो विमानाने दिल्ली गाठणार आहे. २0१३ वर्षात 'संस्काराचे मोती' या उपक्रमावर आधारित ही स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यभरातून तब्बल २५ लाखांवर विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. जवळपास ३००० शाळांच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. गडचिरोलीतील सर्वच शाळांच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी प्रत्येकी एका विद्यार्थ्याची निवड झाली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातून वियाणी विद्या निकेतन नवेगाव कॉम्प्लेक्सच्या श्रेयस विलास खवड या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. लोकमतच्या 'संस्काराचे मोती' उपक्रमातून श्रेयसची एकमेव निवड झाल्याने त्याचा प्राचार्य लीली सब्सटीयन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धात्मक परीक्षेच्या अनुषंगाने लोकमतमध्ये सुरू असलेला 'संस्काराचे मोती' हा उपक्रम प्रेरणादायी असून, चालू सत्रात लोकमतमध्ये सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्यांनी आयोजित सत्कार सोहळ्यादरम्यान केले. सत्कार कार्यक्रमाला फादर रॉबर्ट निकोलस, श्रेयसची आई पुष्पलता खवड, नैना दरडमारे, मुकेश सोनकुसरे, जीजा ठेंगरे, पूनम यादव, प्रशांती वाघमारे आदी उपस्थित होते. दरम्यान वियाणी विद्या निकेतन कॉन्व्हेंटच्या शिक्षिकांनी लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक केले. (शहर प्रतिनिधी)
श्रेयस खवड ठरला ‘हवाई सफर’चा मानकरी
By admin | Updated: July 5, 2014 00:41 IST