नियंत्रण ठेवण्यास अडचण : ३२० विद्यार्थिनींचा भार एकाच अधीक्षिकेवर आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन लांझेडा परिसरातील मुलींच्या वसतिगृहाचे विस्तारीकरण करण्यात आले. यानुसार दोन स्वतंत्र वसतिगृहाच्या इमारती उभारण्यात आल्या. वसतिगृहाच्या जुन्या इमारतीशेजारी दोन नवीन वसतिगृह सुरू करण्यात आले. या तिनही वसतिगृहात सध्या कनिष्ठ महाविद्यालयीनपासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ३२० मुली निवासी राहून शहरातील विविध महाविद्यालयातून शिक्षण घेत आहेत. या वसतिगृहाची प्रवेश क्षमता पूर्वी १२० होती. त्यानंतर नवीन दोन वसतिगृह उभारण्यात आल्याने या वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यात आली. सद्य:स्थितीत जुन्या वसतिगृहात १२०, नवीन वसतिगृह क्रमांक १ मध्ये १०० व वसतिगृह क्रमांक २ मध्ये १०० अशा एकूण ३२० कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. या तिनही वसतिगृहासाठी अधीक्षीका कनिष्ठ लिपीक, सफाईगार, चौकीदार व शिपाई आदी पाच कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांची ही संख्या जुनीच आहे. विद्यार्थी क्षमतेनुसार वसतिगृहातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्त करणे गरजेचे आहे. मात्र याबाबत आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त कार्यालयाच्यावतीने सध्यातरी कोणत्याही प्रकारचा निर्णय झाली नसल्याची माहिती आहे. पुरेशा कर्मचाऱ्याअभावी जुन्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर वसतिगृहाच्या व्यवस्थेचा अतिरिक्त ताण पडला आहे. या वसतिगृहात सुरक्षा रक्षकाचा अभाव आहे. तसेच या वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही. यामुळे वसतिगृहातील ३२० विद्यार्थिनींवर नियंत्रण ठेवणे येथील कर्मचाऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. या वसतिगृहात एकच अधीक्षीका असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनींच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवणे कठीण जात आहे.वसतिगृहाची संरक्षण भिंत फोडलीगडचिरोली शहराच्या बाहेर लांझेडा पसिरात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीला लागून जिल्हा स्टेडीअम आहे. या स्टेडीअमवर शहरातील अनेक युवक तसेच विद्यार्थी खेळण्याचा सराव करण्यासाठी जातात. मात्र काही अज्ञात युवकांनी वसतिगृहाची संरक्षण भिंत फोडली. या संदर्भाची माहिती संबंधीत वसतिगृह प्रशासनाने प्रकल्प कार्यालयाला कळविली आहे. मात्र अद्यापही संरक्षण भिंतीची दुरूस्ती करण्यात आली नाही. या फोडलेल्या भिंतीतून वसतिगृहात सहज प्रवेश करता येतो. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Updated: September 20, 2014 23:49 IST