धान्य पुरवठ्याचा अभाव : अनेक शाळेत आहार शिजलाच नाहीआष्टी : २६ जूनपासून जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र बऱ्याच शाळांमध्ये शालेय पोषण आहाराकरिता पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश शाळांमध्ये शालेय पोषण आहाराला दांडी मारली जात असल्याचे चित्र आहे. बहुतांश शाळांमध्ये पोषण आहार शिजलाच नसल्यामुळे विद्यार्थी आहारापासून वंचित आहेत. परिणामी शासनाच्या मध्यान्ह पोषण आहार योजनेचा फज्जा उडाला आहे. शासन व प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी २६ जूनला नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यासाठी अनेक गावांत रॅली काढण्यात आली. यात लोकप्रतिनिधींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षक सहभागी झाले. मात्र शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी शासन व प्रशासनाने कुठलीही व्यवस्था केली नाही. परिणामी अनेक शाळेमध्ये शालेय पोषण आहाराकरिता धान्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे दोन आठवड्यात अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला नाही. जिल्ह्याच्या काही जि. प. शाळांमधील मुख्याध्यापकांनी मागील वर्षीचा शिल्लक उरलेला काही धान्यसाठा व्यवस्थित राखून ठेवला. अशा मोजक्याच शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्या जात आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, विद्यार्थी शाळेत नियमित यावे, यासाठी शासनाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरू केली. मात्र प्रभावी अंमलबजावणी नाही. (प्रतिनिधी)अहेरी, चामोर्शी तालुक्यात धान्य पुरवठा नाहीअहेरी व चामोर्शी तालुक्यात अद्यापही शालेय पोषण आहाराकरिता पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा झाला नसल्याची माहिती आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी व कोनसरी केंद्रांतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात न आल्याने या शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांकरिता पोषण आहार शिजला नसल्याची माहिती आहे. आष्टी केंद्रात केवळ मार्र्कं डा (कं.) व एका खासगी शाळेत आहारासाठी धान्याचा पुरवठा झाला आहे. मात्र या केंद्रातील १३ शाळांमध्ये धान्य पुरवठा न झाल्याने विद्यार्थी आहारापासून वंचित आहेत.चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत कोनसरी केंद्रातील १३ जिल्हा परिषद शाळांमध्ये मागील वर्षीचा पोषण आहाराचा धान्यपुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये नियमित पोषण आहार दिला जात असल्याची माहिती केंद्रप्रमुखांनी दिली आहे. मात्र यंदाच्या २०१५-१६ च्या सत्रात अद्यापही कोनसरी केंद्रातील शाळांना पोषण आहाराकरिता धान्य पुरवठा झाला नसल्याची माहिती आहे. चामोर्शी तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी शाळांमध्ये धान्याचा पुरवठा करणे सुरू झाले आहे. चामोर्शी पं. स. अंतर्गत चार केंद्रावर तेथील शाळांकरिता धान्य पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित केंद्रांमध्ये लवकरच धान्य पुरवठा होईल.- एस. जी. परदेशी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, चामोर्शी
शालेय पोषण आहाराला दांडी
By admin | Updated: July 7, 2015 01:28 IST