दरवर्षी ५५० बॅग रक्त : १९८४ पासून उपक्रमदिगांबर जवादे गडचिरोली‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे म्हणतात. हे १०० टक्के सत्यात उतरविण्याचे काम गडचिरोली जिल्ह्यातील निरंकारी मंडळाने केले आहे. १९८४ पासून संत निरंकारी मंडळ दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करीत आहे. प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिरातून जवळपास ५५० बॅग रक्त जिल्हा रूग्णालयाला पुरविण्याचे काम संत निरंकारी मंडळाने अखंडीतपणे सुरू ठेवले आहे. आधुनिक युगात मंदिर व धार्मिक ठिकाणांबाबत दातृत्व जपणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अनेक मंदिराच्या तिजोऱ्या पैशाच्या ढिगाने भरून गेल्याचे आपण वेळोवेळी वाचत असतो. गोरगरीबांना साधी पाच-पन्नास रूपयांची रक्कमही दान केली तरी प्रसिध्दी करणारे अनेक लोक आज समाजात दिसतात. मात्र मानवी जीवनाला ज्या रक्ताची गरज आहे. ती भागविणारे हात आज कमी झाले आहेत. अनेक प्रकाराने जनजागृती करूनही रक्तदान करण्यासाठी कुणी सरसावत नाही. गडचिरोली या मागास जिल्ह्यात रक्ताची टंचाई वर्षभर जाणवते. अनेकदा रूग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी भटकावे लागते. अशा परिस्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयाला व जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयांना वर्षाला ५५० बॅग रक्त पुरवठ्याची जबाबदारी सत निरंकारी मंडळाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. नुसती जबाबदारी घेऊनच हे थांबलेले नाहीत. तर वर्षातून एकदा रक्तदान शिबिर आयोजित करून मोठ्या संख्येने रक्तदात्यांकडून रक्त जमा करून ते रूग्णालयामार्फत रूग्णांपर्यंत पोहोचविण्याचे पुण्यकर्म हे मंडळ १९८४ पासून करीत आहे. अद्यापही यांचा रक्तदानाचा हा महायज्ञ थांबलेला नाही, हे विशेष.अशी मिळाली प्रेरणा!संत निरंकारी मंडळाचे सद्गुरू गुरूबच्चनसिंग महाराज यांची २४ एप्रिल १९८४ रोजी हत्या करण्यात आली. या हत्येच्या विरोधात या मंडळाचे अनुयायी पेटून उठले. त्यांची समज घालताना गुरूबच्चनसिंग यांचे सुपूत्र हरदेवसिंग महाराज यांनी रक्ताचे पाट रस्त्यावर वाहण्यापेक्षा रक्तदान करून दुसऱ्यांचे जीव वाचवा, असा संदेश दिला. तेव्हापासून २४ एप्रिल हा दिवस ‘मानव एकता दिन’ म्हणून पाळला जातो. यादिवशी देशभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन संत निरंकारी मंडळाच्या मार्फतीने केले जाते. याशिवाय इतरही दिवशी रक्तदान केले जाते. या मंडळात निरंकारी मंडळाचे अनुयायी रक्तदान करतातच. त्याचबरोबर इतरानीही रक्तदान करावे, याबाबत आठ दिवसांपूर्वीपासून जनजागृती केली जाते. यावर्षी देसाईगंज येथील रक्तदान शिबिरात ४३२ बॅग रक्त गोळा करून देण्यात आले. हा आजपर्यंतचा विक्रमी आकडा आहे. देसाईगंजबरोबरच कुरखेडा, गडचिरोली, अहेरी व ग्रामीण भागातही रक्तदान शिबिराचे आयोजन निरंकारी मंडळ करीत असते. हे सर्व करण्यासाठी संत निरंकारी मंडळाचे जिल्हा संयोजक आसाराम निरंकारी, क्षेत्रीय संचालक हरिषकुमार निरंकारी, कुरखेडाचे मुखी माधवदास निरंकारी, गडचिरोलीचे मुखी तुंकलवार, मंडळाचे स्वयंसेवक तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्यासह इतर अनुयायी सहकार्य करतात.
रक्ताचे दातृत्व जपणारे संत निरंकारी मंडळ
By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST