लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहराजवळील नवेगाव, मुरखळा, पुलखल, मुडझा (बु) व मुडझा (तु) येथे प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांतून विरोध होत आहे. सुपीक जमिनीचे अधिग्रहण करून तेथे विमानतळ उभारणे हितावह नाही, त्यामुळे तेथील भूसंपादन रद्द करून नव्या जागेचा शोध सुरू केल्याचे स्पष्टीकरण सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी दिले.
अॅड. जयस्वाल २३ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर होते. जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतल्यावर सायंकाळी सहा वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जि.प. सीईओ सुहास गाडे उपस्थित होते. देसाईगंजात जेएसडब्ल्यू या कंपनीच्या नियोजित उद्योगासाठी, तसेच गडचिरोलीजवळ विमानतळ उभारण्यासाठी नियोजित भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे, यानुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अॅड. सहपालकमंत्री म्हणाले, १ जूनला विमानतळाच्या भूसंपादनाबाबत काही शेतकरी भेटले होते.
शेतकऱ्यांचे हित राखण्यास सरकारचे प्राधान्यकोटगल येथे सिंचनासाठी मोठा प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पाखालील सुपीक जमिनी विमानतळासाठी घेऊ नयेत, अशी त्यांची मागणी होती. ते आर्त भावनेने बोलत होते, त्यामुळे ही बाब ६ जूनला जिल्हा दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवली. त्यानंतर त्याच दिवशी विमानतळासाठी पर्यायी जागा शोधण्याचा निर्णय झाला, असे अॅड. जयस्वाल यांनी सांगितले. देसाईगंजातही विरोध आहे, पण भूसंपादन कायद्यान्वये योग्य ती भरपाई देऊन उद्योगांचा विस्तार करणे हे सरकारचे धोरण आहे, असे ते म्हणाले.
बेतकाठी पूल कामाची चौकशी होणारकोरची तालुक्यातील बेतकाठी, नाडेकल, डोली टोला (बामनदेव) या मार्गावरील खोब्रागडी नदीवरील पूल बांधकाम पूर्ण होण्याआधीच कोसळला. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी १६ जूनपासून सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे व सहकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत. कुडवे यांनी सहपालकमंत्री अॅड. जयस्वाल यांची भेट घेत निवेदन दिले. यावर सहपालकमंत्री म्हणाले, बेतकाठी पुलाच्या कामाची चौकशी होणार, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.