८६ शेतकऱ्यांना लाभ : खरिपाच्या तुलनेत नगन्य गडचिरोली : शेतकऱ्यांकडे पाणीपंप, विहीर यांची सोय झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता रबी पिकाचीही पेरणी करू लागला आहे. चालू रबी हंगामात ३० हजार हेक्टरवर रबीची पेरणी करण्याचे नियोजन होते. त्यापैकी जवळपास २० हजार हेक्टरवर पेरणी झाली असून बँकांकडून ५१ लाख रूपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक धानपिकाची लागवड केली जाते. सुमारे सव्वा लाख हेक्टरवर धान पीक घेतले जाते. धान पिकाची लागवड प्रामुख्याने खरीप हंगामात केली जाते. चामोर्शी, सिरोंचा व आरमोरी तालुक्यात काही निवडक शेतकरीच उन्हाळी धान पिकाची लागवड करतात. रबी पिकाचे मात्र जिल्हाभरात उत्पादन घेतले जाते. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने सूर्यफूल, चना, लाखोळी, लाख, वाटाणा, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांचा समावेश आहे. काही शेतकरी उन्हाळी तूर पिकाचेही उत्पादन घेतात. चांगली मशागत करण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च होतो. यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा राहत नाही. त्याचबरोबर शासन बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देते. याचा लाभ शेतकरी उचलतात. चालू रबी हंगामात सुमारे ५१ लाख रूपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतले आहे. यामध्ये सर्वच कर्ज बँक आॅफ इंडियाने दिले आहे. रबी हंगामामध्ये २ हजार १९९ शेतकऱ्यांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ८६ शेतकऱ्यांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे. खरीपाच्या तुलनेत रबीतील कर्ज वितरणाचे प्रमाण कमी आहे. बहुतांश रबी पिकांसाठी फार मोठ्या प्रमाणात लागवड खर्च येत नसल्याने बहुतांश शेतकरी रबीसाठी कर्ज घेत नसल्याचा अनुभव आहे. (नगर प्रतिनिधी) रबीचे क्षेत्र वाढविण्याची गरज बहुतांश शेतकऱ्यांकडे शासनाने अनुदानावर दिलेले पाणीपंप आहे. शासनाने विहीरही खोदून दिली आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडे जल सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र शेतकरी रबी पिकांचे उत्पादन घेत नाही. या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाल्यास हे शेतकरी सुध्दा रबी पिकांची लागवड करतील. उत्पन्न वाढल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. खरिपाच्या तुलनेत कर्ज वितरण कमी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी रबी पिकांची पेरणी करतात. मात्र धानाच्या तुलनेत रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना अत्यंत कमी खर्च येतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी कर्ज घेत नाही. काही दिवसांपर्यंत सदर कर्ज बिनव्याजी देण्यात येत असले तरी उगाच आपल्या डोक्यावर कर्जाचे बोझा नको, या उद्देशानेही शेतकरी कर्ज घेत नाही. त्याचबरोबर धान पीक निघाला राहत असल्याने शेतकऱ्यांकडे पैसा खेळण्यास सुरूवात होते. त्यामुळे रबी हंगामासाठी येणारा खर्च शेतकरी वर्ग धानाच्या उत्पन्नातून करून घेतात. त्यामुळे रबी हंगामात कर्ज घेण्याचे प्रमाण कमी आहे.
रबीत ५१ लाखांचे कर्ज वितरित
By admin | Updated: December 23, 2016 00:56 IST