लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज शहरातील मुख्य मार्गावर दुकानदारांचे अतिक्रमण वाढले असून, राज्य परिवहन महामंडळ तसेच अन्य खासगी वाहने रस्त्यावरच उभी राहात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, न. प. प्रशासनाची कारवाई थंडबस्त्यात आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातून आरमोरी-वडसा-कुरखेडा हा राज्य महामार्ग गेला आहे. त्यातच या मार्गावर बसस्थानक आहे. याच भागातून मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठीही अनेक मार्ग आहेत. शहरातील प्रत्येक भागात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याने हा परिसर नेहमीच वाहनांच्या वर्दळीने तसेच विक्रेत्यांच्या गर्दीने गजबलेला असताे. सध्या कोरोना महामारी आटोक्यात आल्याने सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने, बाजारपेठ, शाळा सुरु झाल्याने रस्त्यावर लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांचीच वर्दळ असते. शहरातील कुरखेडा टी पाईंट ते सार्वजनिक बांधकाम विभागाजवळील राज्य महामार्ग या परिसरात अतिक्रमण वाढले आहे. त्यातच ग्राहकांची वाहने, प्रतिष्ठानापर्यंत माल पोहोचविणाऱ्या गाड्या या रस्त्यावरच उभ्या राहात असल्याने वाहतुकीसाठी अत्यंत कमी रस्ता उपलब्ध हाेताे.
बसस्थानक परिसरात तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसेस लागतात. येथील वाढलेल्या अतिक्रमणामुळे या परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे पादचारी, शालेय मुले, आबालवृद्ध यांना जीव मुठीत घेऊनच येथून मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे या मुख्य राज्य महामार्गावरील अतिक्रमण संबंधित विभागांनी हटवून सुव्यस्थित वाहतुकीसाठी पर्याप्त मार्ग उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.