सिरोंचा : मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्व्हेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे या भागातील धानपिकाचे पुनर्सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी रेगुंठा परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसर पूर्णत: मागासलेला असून या परिसरातील बहुसंख्य नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. परंतु मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील नदी- नाल्यांना पूर आला. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतींची पाहणी अथवा सर्वेक्षण न करताच तलाठ्यांनी या भागात कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल तहसीलदारांना सादर केला, असा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. रेगुंठा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. मात्र धानपिकांचे योग्य प्रकारे सर्व्हेेक्षण झाले नाही. या परिसरातील शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाल्याने नागरिकही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या परिसरात अतिवृष्टीमुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याबरोबरच परिसरातील अनेक शेकडो हेक्टर शेती खरडून गेली. अनेक शेतांमध्ये रेतीही आली. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिसरात बहुसंख्य शेतकरी धानपिकाची लागवड करता. त्यामुळे रेगुंठा परिसरातील शेतीचे पुनर्सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदन देतांना सुरेश बालय्या डुरके, सत्यनारायण पोचम परपटलाव, रामय्या मलय्या पिडगु, समय्या मलय्या पोलमपल्ली, तिरूपती भिमय्या पोलमपल्ली, स्वामी सांबय्या पोलमपल्ली, चंद्रया पोचम पोलमपल्ली, व्यंकन्ना पोचम बिरदू, चंद्रू मोंडी रामटेके, नागय्या रामय्या तोगेटी, राजम रामय्या चेलूरी, रामय्या व्यंकया आकूला, चंदू बापू जनगाम, पोशन्ना मदनया आकूला, किष्टय्या नानय्या डुरके, बापू लचय्या पोलमपल्ली, राजू व्येंकटी डुरके, मल्लीकार्जुन आकुला, अॅड. तिरूपती कोंडागोर्ला, मोंडी मलय्या सुकरी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
पिकांचे पुनर्सर्वेक्षण करा
By admin | Updated: September 17, 2014 23:49 IST