गडचिरोली : पेट्रोल व डिझेल वाचविण्याबरोबरच संतुलनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी २२ सप्टेंबर हा दिवस कारविरहित दिन म्हणून पाळल्या जाते. या दिनानिमित्त भगवंतराव हिंदी हायस्कूल व इतर शाळांनी शहरातून रॅली काढली. सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली तथा राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर रोजी शहराच्या मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीत शिवाजी हायस्कूल गडचिरोली, संत गाडगे महाराज, राणी दुर्गावती हायस्कूल, विद्याभारती कन्या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिक्षक एम. जे. पदा, एस. एम. खांडरे, एम. एम. खुणे, बी. वाय. जांभुळकर, एस. एम. डांगे, राजेश बिचुरे, के. व्ही. कारेकार यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.भगवंतराव हिंदी हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेना विभागाच्यावतीनेही शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्या लिना हकीम, वनीकरण विभागाचे सय्यद, हेमके, रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते. सदर रॅली तहसील कार्यालय, इंदिरा गांधी चौक, वंजारी मोहला व आरमोरी मार्गाने काढण्यात आली. त्यानंतर स्थानिक इंदिरा गांधी चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. दिवसेंदिवस वाहनांचा वापर वाढत चालला आहे. जमिनीतून खनीज तेलाचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात असल्याने दिवसेंदिवस पेट्रोलचे साठे कमी होत चालले आहेत. वाहनांमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. यावर आळा घालण्यासाठी दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी कारविरहित दिनाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये किमान या दिवशी कार किंवा दुचाकीचा वापर न करता. सायकल, सार्वजनिक वाहन आदींचा वापर कार्यालयात जाण्यासाठी करावा, असा संदेश देण्यात येतो. गडचिरोली येथील सामाजिक वनीकरण विभागाने पुढाकार घेत गडचिरोली शहरात कारविरहित दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी पर्यावरण संतुलनाबाबत पोस्टर, नारे, घोषवाक्य, फलक आदींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली. विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
कारविरहित दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली रॅली
By admin | Updated: September 22, 2014 23:19 IST