घोट : चामोर्शी तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वसलेल्या गावात अनेक समस्या आहेत. तालुक्यातील रेगडी- कसनसूर मार्गाची दुर्दशा झाली असून या मार्गावरील पुलानजीक मोठे खड्डे पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र रस्ता व पुलावरील खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना येथून वाहतूक करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याने छत्तीसगडमार्गे नेहमीच वाहतूक असते. त्यामुळे ट्रक, ट्रॅक्टर व इतर चारचाकी वाहने या मार्गाने ये- जा करीत असतात. मार्गावर अनेक ठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. परंतु रस्त्याच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सदर भाग संवेदनशील असल्याने या परिसरात अनेक कंत्राटदार रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी धजावत नाही. परिणामी अनेक लहान-मोठ्या गावात जाण्यासाठी रस्ते नाहीत. परिणामी अनेक नागरिकांना १० ते १५ किमीची पायपीट करावी लागत आहे. रेगडी- कसनसूर हा मार्ग प्रमुख असल्याने या रस्त्याने झुरी, हेटेवाही, कसनसूर, रेगडी, कोंदेवाही, गरंजी, विकासपल्ली येथील नागरिक नियमित ये-जा करतात. येथील गावांसाठी रेगडी येथे प्रमुख बाजारपेठ असल्याने तसेच विकासपल्ली येथे धार भरडाईची व्यवस्था असल्याने येथे परिसरातील नागरिक नेहमीच ये-जा करतात. रस्त्याची दुर्दशा आहेच शिवाय पुलालगत मोठे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे दुरूस्ती करण्याची मागणी आहे.
रेगडी-कसनसूर मार्ग दुरवस्थेत
By admin | Updated: February 1, 2015 22:57 IST