जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी : रेशीम उत्पादनवाढीसाठी शासनातर्फे प्रयत्नगडचिरोली : जिल्ह्यातील वातावरण रेशीम उत्पादनासाठी अतिशय लाभदायक असल्याने शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनाच्या माध्यमातून जोडधंदा उपलब्ध होऊ शकतो. या व्यवसायात अधिकाअधिक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उतरावे, यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र मोबाईल व्हॅन तयार करण्यात आले. या मोबाईल व्हॅनला ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी हिरवी झेंडी दाखविली. आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज तालुक्यात रेशीमचे उत्पादन घेतले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेशीमचे उत्पादन घेतल्यास रेशीम उत्पादनात आणखी दुपटीने वाढ होण्यास वाव आहे. विशेष म्हणजे, रेशीम उत्पादनासाठी पाहिजे तेवढा अधिकचा खर्च येत नाही. त्यामुळे गरीब शेतकरी सुध्दा रेशीमचे उत्पादन घेऊ शकतो. रेशीमचे उत्पादन वाढावे, यासाठी राज्य शासनाने महा-रेशीम अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय आरमोरीच्या वतीने प्रचारवाहन तयार करण्यात आले आहे. या प्रचारवाहनाला जिल्हाभरात फिरविले जाणार आहे. प्रचार वाहनाला हिरवी झेंडी दाखवितेवेळी अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, नाझर बल्लारपुरे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी गणेश राठोड उपस्थित होते. या वाहनाच्या माध्यमातून जिल्हाभरात २५ मार्चपर्यंत जनजागृती केली जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)
मोबाईल व्हॅन करणार रेशीम उत्पादनाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 02:16 IST