यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांपर्यंत थेट उमेदवार पोहोचत असले तरी सुरुवातीला मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत. दिवसेंदिवस काळानुसार प्रचाराचे माध्यम बदलत चालले आहे. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवाराचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दोन ते तीन पॅनेल एकमेकांविरोधात उभे ठाकले असून कुणी ग्रामविकास तर कुणी लोकविकास असे विविध विकासाच्या नावावर पॅनेल उभे केले आहे आणि पॅनेलच्या नावावर उमेदवार निवडणूक लढत आहेत.
आरमोरी तालुक्यात ग्रामपंचायतीकरिता १५ जानेवारीला मतदान होत आहे .त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उभे असलेले उमेदवार व त्यांचे पॅनेल डिजिटल बॅनर व डिजिटल शिकवणी पत्रिका घेऊन मतदारापर्यंत पोहोचत आहेत. यावर्षी निवडणूक आयोगाने सातवी पास असलेला व्यक्तीच ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहू शकतो, असा नियम काढल्यामुळे या निवडणुकीत सुशिक्षित उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत .आज खेड्या-पाड्यात अँड्रॉइड मोबाईल पोहोचले आहेत. त्यामुळे मोबाईलद्वारे व्हाॅटस् ॲप ,फेसबुक व मेसेंजरच्या माध्यमातून उमेदवार थेट पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत शिवाय गावात चौकाचौकांत प्रभागात वाॅर्डात पॅनेलचे बॅनर लावण्यात येत आहेत. त्यामुळे कोणता उमेदवार कोणत्या पॅनेल कडून निवडणूक लढवत आहे हे मतदारांना सहज माहीत होतं आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभागात सोशल मीडिया प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरत आहे. याच माध्यमातून मतदारांकडे पोहोचण्याचा प्रयत्न अनेक उमेदवार करत आहेत.
पूर्वी साध्या शिकवणी पत्रिका उमेदवार काढल्या जात होत्या. मतदारांच्या कुटुंबापर्यंत पोहोचत होते आताही ‘डोअर टू डोअर’ पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहे. मात्र, शिकवणी पत्रिका आता कलर व डिजिटल स्वरूपात असून त्यावर उमेदवाराचा फोटो आहे. निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका पॅनेलनिहाय प्रभागात पोहोचत आहेत शिवाय जे मतदार हजर नाही जे बाहेरगावी राहतात व कामानिमित्त बाहेर गेले आहेत त्यांच्यापर्यंत साेशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे.