लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्याच्या कारवाफानजीक साखेरा टोला येथे भरलेल्या कोंबड बाजारात काही पोलिसांनी साध्या वेशात येऊन धाड टाकली व येथून ३५ पेक्षा अधिक नागरिकांना अटक केली. यामध्ये बऱ्याच निरपराध नागरिकांचा समावेश आहे. अटक केलेल्या कुटुंबप्रमुखांना पोलिसांनी बेदम मारहाण केली, असा आरोप करीत साखेरा टोला गावातील महिलांनी आमदारांपुढे आपली व्यथा मांडत आमच्या कुटुंब प्रमुखांची मुक्तता करा, असे साकडे आ.डॉ.देवराव होळी यांना घातले.कोंबड बाजाराच्या नावावर साखेरा टोला गावातील नागरिकांना अटक केल्याची माहिती मिळताच मंगळवारी आ.डॉ.देवराव होळी यांनी सदर गावाला भेट दिली व तेथील महिलांशी संवाद साधला. यावेळी अनेक महिलांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला. साखेरा टोला हे जेमतेम ४८ घरांची लोकवस्ती असलेले छोटेसे गाव आहे.पोलीस विभागामार्फत होणारा जनजागरण मेळावा गावात आयोजित करण्यास नागरिकांनी मदत केल्यास कोंबड बाजार भरविण्यास परवानगी देण्यात येईल, असे आमिष कारवाफा पोलिसांकडून ग्रामस्थांना दिले होते, असे गावकऱ्यांनी सांगितले. त्यानुसार साखेरा येथे जनजागरण मेळावाही पार पडला. त्यानंतर कोंबड बाजार भरण्यास सुरूवात झाली. दरम्यान भरलेल्या कोंंबड बाजारात साध्या वेशातील काही पोलिसांनी धाड टाकली. कोंबड बाजारात चणे, फुटाणे व इतर किरकोळ वस्तू विकणाऱ्या लोकांनाही पोलिसांनी मारहाण केली, अशी माहिती महिलांनी आ.डॉ.होळी यांना दिली. कुटुंब प्रमुख पोलिसांच्या ताब्यात असल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे, असे महिलांनी सांगितले. पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीपोटी गावातील काही नागरिकांनी दुसºया गावात पलायन केले आहे. साखेरा टोला गावात पोलिसांची दहशत आहे, असेही महिलांनी सांगितले. मारहाण करणाºया गैरजबाबदार पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी आमदारांकडे लावून धरली. यावर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन डॉ.होळी यांनी महिलांना दिले.