सिरोंचात जनता दरबार : १५० वर तक्रारींपैकी ८० तक्रारींचा झाला निपटारासिरोंचा : सिरोंचा येथील नगर पंचायतीच्या भवनात खा. अशोक नेते यांचा जनता दरबार मंगळवारी पार पडला. या जनता दरबारात परिसरातील नागरिकांनी आपल्या अनेक अडचणी खासदारांच्या कानी घातल्या. जनतेचे प्रश्न तत्काळ सोडवा, असे निर्देश यावेळी खासदारांनी अधिकाऱ्यांना दिले.या कार्यक्रमाला भाजपचे अहेरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाबुराव कोहळे, जिल्हा सचिव डॉ. भारत खटी, सिरोंचातील ज्येष्ठ नेते दामोधर अरगेला, सत्यनारायण मंचर्लावार, तालुका अध्यक्ष संदीप राचर्लावार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शिवाजी पवार, तहसीलदार मिश्रा, संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे, तालुका उपाध्यक्ष माधव कासर्लावार, राऊत, श्रीधर आणकरी, व्यंकटी गावडे, किरण कुलसंगे, सुरेजा जवाजी, राजेश्वरी बेझलवार, लक्ष्मी गुडदी, पोलीस निरीक्षक दीपक लुकडे आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यात सुरू करण्यात आलेले भारनियमन बंद करण्याच्या सूचना खासदारांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भारत संचार निगमची सेवा सुरळीत करण्यासोबत वनजमिनीचे पट्टे नागरिकांना त्वरित वितरित करावे, पुरामुळे नदीपात्रातील शेती वाहून गेली आहे, त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांना खासदारांनी दिल्या. बैकन राजन्ना गटरू या शेतकऱ्याची म्हैस विजेच्या धक्क्याने मरणपावली. त्यांनाही मदत देण्याचे निर्देश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. सिरोंचा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्तपदे भरण्यासोबत आमडेली, पेंटीपाका येथे बीएसएनएलचे नवीन टॉवर उभारण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना केल्या. धान्य साठवणासाठी ओटे व नवीन गोदाम बांधकामाबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. १५० नागरिकांच्या तक्रारी व सूचना यावेळी जनता दरबारात खासदारांनी जाणल्या. ८० तक्रारींचा निपटारा करण्यात आला. या कार्यक्रमात सागवान तस्करांना पकडून शासनाच्या स्वाधीन करण्याच्या कामात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आसरअल्ली येथील गजानन कलाक्षपवार यांचा खासदारांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन बीडीओ मरस्कोल्हे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
खासदारांसमोर मांडल्या जनतेने व्यथा
By admin | Updated: July 17, 2015 01:37 IST