वाहतूक प्रभावित : राजीव गांधी चौक अतिक्रमणाच्या विळख्यातदेसाईगंज : रेल्वे मार्ग असल्याने देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. रेल्वे विभागाच्या वतीने नवीन मार्ग निर्मिती, प्लेटफार्म तयार करणे व इतर कामे सुरू आहे. त्यामुळे उडाणपुलावरूच आवागमन करावे लागते. उडाण पुलावरील सर्व नागरिक राजीव गांधी चौकात असतात. मात्र येथे गॅस वितरण कार्यालय असल्याने सिलिंडरने भरलेले वाहन व गॅससाठी येणाऱ्या ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. खासगी ट्रॅव्हल्स व आॅटोचे थांबे येथेच असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. शहराच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या अलिकडील भागात देसाईगंज शहराची लोकसंख्या वाढत आहे. ब्रह्मपुरी मार्गावर राजीव गांधी चौकापासून उडाणपुलावर चढण्याचा मार्ग सुरू आहे. पादचारी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, रेल्वे प्रवाशी यांना पायी ये-जा करण्यासाठी एकच रस्ता असून तो वर्दळीचा आहे. मात्र येथील गॅस एजन्सीने आपल्या गॅस वितरणाचा संपूर्ण पसारा रस्त्यावरच चालविला आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होते. ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या आॅटो, नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा येथेच थांबा असल्याने वाहनांची प्रचंड गर्दी राहते. अशा गर्दीतून उडाणपुलावरून येणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे. गॅस वितणाचे ठिकाण बदलविण्यात यावे, तसेच खासगी ट्रॅव्हल्स व आॅटोचे थांबे येथून इतरत्र हलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
गॅस वितरणाचा पसारा रस्त्यावर
By admin | Updated: September 2, 2016 01:23 IST