आरमोरी : नगर पंचायतीच्या वतीने शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आरमोरी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी गाढवी व वैनगंगा नदीवर पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही नद्यांमध्ये वर्षभर पाणी राहते. तरीही नगर पंचायतीच्या वतीने मागील आठ-दहा दिवसांपासून एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा करणे सुरू केले आहे. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एक दिवसानंतरही १० ते १५ मिनिटेच पाणी पुरविल्या जाते. आरमोरी शहरात दिवसेंदिवस अवैध टिल्लू पंपाची संख्या वाढत चालली आहे. या पंपाच्या सहाय्याने पाण्याची चोरी केली जात असल्याने नळधारकांना पाणीच मिळत नाही. याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही नगर पंचायत प्रशासन सदर टिल्लूपंपधारकांवर कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
आरमोरीत एक दिवसाआड पाणी पुरवठा
By admin | Updated: June 8, 2015 02:09 IST