गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यात चांगल्या वातावरणात नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुका पार पडू शकल्या. हे आता स्पष्ट झाले आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिंग पार्ट्या पाठविण्याच्या कामासह मतदानाची टक्केवारी टिकवून ठेवणे व पोलिंग पार्ट्या परत आल्यानंतर ईव्हीएम संग्रहीत करून घेणे या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा दिवस-रात्र राबली. जिल्हाधिकारी कार्यालयाचा निवडणूक विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले. लोकसभा निवडणुकीतही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक काम केले. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामासाठी लागून होती. नागरिकांकडून तसेच माध्यमांकडून येणाऱ्या सूचनांवरही त्यांनी तत्काळ दखल घेत आवश्यक ते बदल केलेत. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात मतदानाची वेळ २००९ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या कालावधीत चांगले मतदान व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी जनजागृतीवर मोठा भर दिला. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदा मतदानासाठी व्यापक जनजागृती मोहीम गावपातळीवर राबविण्यात आली. त्यामुळे नक्षलग्रस्त भागातही चांगले मतदान होऊ शकले. देसाईगंज, गडचिरोली, अहेरी या तिनही ठिकाणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनीही निवडणूक कामासाठी गेल्या २०-२२ दिवसांपासून प्रचंड मेहनत घेऊन काम केले. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही फेरमतदान घेण्याची वेळ आली नाही. या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही निवडणूक कामासाठी परिश्रमपूर्वक काम केले. त्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारीही वाढली.पोलीस यंत्रणेने प्रशासकीय यंत्रणेला चांगली साथ देत दुर्गम गावातही मोठे मतदान व्हावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या. त्यामुळे चांगले मतदान अहेरी विधानसभा क्षेत्रात होऊ शकले. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाचे परिश्रम निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांनी निवडणूक कामासाठी केली दिवस-रात्र एक
By admin | Updated: October 18, 2014 23:24 IST