काँग्रेसचे शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन : उसेंडींनी दिले कारवाईचे संकेतगडचिरोली : प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ जुलै रोजी गुरूवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. मात्र या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले अशा पदाधिकाऱ्यांना पक्षातर्फे नोटीस बजाविण्यात आली असून सात दिवसांच्या आत त्यांच्याकडून समाधारकारक उत्तर प्राप्त न झाल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांनी पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिली आहे. माजी आ. डॉ. उसेंडी यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक जिंकून अनेक पदाधिकारी राजकीय पदाचा उपभोग घेत आहेत. मात्र गुरूवारी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या बैलबंडी मोर्चात अनेक पदाधिकारी अनुपस्थित होते. पक्षाचा फायदा घ्यायचा व पक्ष धोरणाच्या कार्यक्रमात उपस्थित न राहणे ही बाब पक्ष धोरणाविरोधी आहे. यामुळे पक्ष संघटन वाढीस अडथळा निर्माण होतो. तसेच काँग्रेस पक्षात सक्रीय काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊन पक्ष बांधणी व पक्ष वाढीसाठी अडथळा निर्माण होते. त्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहणे ही बाब योग्य नाही, असेही माजी आ. डॉ. उसेंडी यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी गैरहजर आढळून आल्यास आपण त्यांची गय करणार नाही, असा इशारा डॉ. उसेंडी यांनी दिला आहे. त्यामुळे मोर्चात गैरहजर असलेल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
गैरहजर पदाधिकाऱ्यांना नोटीस
By admin | Updated: July 15, 2015 01:54 IST