छल्लेवाडातील घटना : माओवाद्यांचे खरे रूप उघड झाल्याचा पोलिसांचा दावाआलापल्ली : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती कार्यक्रमाचा महोत्सव जिल्हाभर साजरा होत असताना माओवाद्यांनी छल्लेवाडा येथील डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस हवालदार नानाजी नागोसे हे शहीद झालेत. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे नक्षलवांद्याचे खरे रूप उघड झाले, अशी प्रतिक्रिया पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे. आजवर माओवादी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करून लोकांना भूलथापा देणाऱ्या नक्षलवाद्यांनी आज त्यांच्याच जयंतीला रक्तपात घडवून आणलेला आहे. डॉ. आंबेडकरांची विचारसरणी मानणारा कोणताही घटक त्यांच्या जन्मदिनी अशी क्रूर कृत्य करू शकत नाही, परंतु नक्षलवाद्यांना आंबेडकरांच्या विचारांशी काहीही देणेघेणे नाही, ते फक्त फायद्यासाठी आंबेडकरांच्या नावाचा वापर करतात. अशा प्रकारचे कृत्य करून नक्षलवाद्यांनी त्यांचे खरे रूप जगाला दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. या घटनेचा अनेकांनी तीव्र शब्दात निषेध केला असून छल्लेवाडा येथील या कार्यक्रमाला माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, अहेरीचे नागसेन मेश्राम, अहेरीचे प्रा. व्ही. एस. सोनोने, आलापल्लीचे भीमराव जुनघरे, आलापल्लीचे गणपतराव तावाडे, आनंद अलोणे, अॅड. उदयप्रकाश गलबले, रघुपती मुरमाडे, कमलापुरचे माजी सरपंच सांबय्या करपेत, राजू गड्डमवार, लक्ष्मण कोडापे, सीताराम मडावी, नागलू मुंजमकर, बरखय्या दुर्गे आदी उपस्थित होते. व्यासपीठावरून अॅड. उदयप्रकाश गलबले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक समाजासमोरील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करीत असताना सहा नक्षलवाद्यांनी हे भ्याड कृत्य केले व डॉ. आंबेडकरांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमावर विरजण घालण्याचे काम माओवाद्यांनी केले, अशी प्रतिक्रिया समाजाच्या सर्व स्तरातून उमटली आहे. या घटनेचा निषेधही अनेकांनी केला. घटनेनंतर रेपनपल्ली परिसरासह अहेरी तालुक्यात सर्वत्र दहशत पसरली. (वार्ताहर)
घटनाकारांच्या जयंतीलाच नक्षलवाद्यांचा रक्तपात
By admin | Updated: April 15, 2016 01:45 IST