मुरूमगाव : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव ते छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या सावरगावपर्यंतच्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेला व दुर्गम तालुका म्हणून धानोराची ओळख असली तरी या मार्गावरून छत्तीसगड राज्यातील जड वाहनांची वाहतूक नेहमीच सुरू असते. सहा महिन्यांपूर्वी मुरूमगाव ते कुलभट्टीपर्यंतच्या ७ किमी मार्गाची दुरूस्ती खासगी ठेकेदाराकडून करण्यात आली. मात्र सदर रस्तासुद्धा सहा महिन्यांतच रखडला आहे. सावरगाव ते कुलभट्टी या मार्गाची तर मागील २ ते ३ वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. नेहमी जड वाहने या मार्गावरून जात असल्याने या मार्गावरील संपूर्ण डांबर उखळून गेले आहे. मात्र साधी डागडूजीसुद्धा प्रशासनाने केली नसल्याने दिवसेंदिवस या मार्गावरील खड्ड्यांचा आकार वाढतच चालला आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी धानोरा तालुक्यातील अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे केली. मात्र सदर भाग नक्षलग्रस्त असल्याने काम करण्यास ठेकेदारच मिळत नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. सावरगाव पर्यंतच्या ग्रामीण भागामध्ये सेवा देणारे ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी धानोरा येथे राहूनच सेवा देतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दररोज ये- जा करावे लागते. मात्र मार्गाची दुर्दशा झाली असल्याने याचा त्रास या वाहनधारकांनाही सहन करावा लागतो. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे सदर मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी मुरूमगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. (वार्ताहर)
मुरूमगाव- सावरगाव मार्गाची दुर्दशा
By admin | Updated: October 8, 2014 23:26 IST