धानोरा येथे आढावा बैठक : विस्तार अधिकाऱ्यांच्या बोगस दौऱ्यांबाबत चौकशीचे दिले निर्देशधानोरा : स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी तालुक्याच्या विकासाबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक त्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या. आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती कल्पना वड्डे, पुष्पा गाडगे, ताराबाई कोटांगले, शशिकांत साळवे, रेखा डोळस, विजय साळवे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, नायब तहसीलदार मडावी, संवर्ग विकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीदरम्यान खासदार अशोक नेते यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. धानोरा तालुक्यात एकूण २६९ बालके कुपोषीत असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिली. तालुक्यात १५९ अंगणवाड्या व १३६ मिनी अंगणवाड्या असून या अंगणवाड्यांच्या माध्यमातून नियमितपणे पोषण आहार उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती दिली. धानोरा-गोडलवाही-मिचगाव (झाडा) ही बस पुढे पेंढरीपर्यंत नेण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. यावेळी खासदार अशोक नेते यांनी अशा प्रकारचे निर्देश एसटी महामंडळाला दिले. गरजू शेतकऱ्यांना बैलबंडीचे वाटप करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या भागातील शिक्षण विस्तार अधिकारी बोगस दौरे दाखवित असल्याची बाब काही लोकप्रतिनिधींनी खासदारांच्या लक्षात आणून दिली. या विस्तार अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन खासदारांनी दिले. धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याने इमारतीतून पावसाळ्यात पाणी गळते. परिणामी सदर इमारत रिकामीच ठेवण्यात आली आहे. दुर्गम भागातील गावांना वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीने खांब उभे करून ठेवले आहेत. मात्र या खांबांना अजुनपर्यंत तार जोडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. परिणामी गावकऱ्यांना अंधारातच राहावे लागत आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकले नाही. आभार सहायक संवर्ग विकास अधिकारी कुळसंगे यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)रिक्त पदे भरण्याबाबत खासदारांना साकडेधानोरा तालुक्याला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण अजुनही कायम आहे. रिक्त पदांमुळे शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास उशीर होत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. अनेक विकास कामे अर्धवट आहेत. परिणामी शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी वापस जात आहे. ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक व अधिकाऱ्यांची तसेच इतर कर्मचऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. विद्युत मंडळातही लाईनमनची पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याला प्राधन्य देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी खासदारांकडे केली.
खासदारांनी जाणली विकासाची माहिती
By admin | Updated: July 20, 2015 01:47 IST