गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात भ्रमणध्वनी सेवेचे जाळे पसरविण्यात भारत संचार निगम लिमिटेडला यश आले असले तरी जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनपर्यंत भ्रमणध्वनी सेवा पोहोचली नाही. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व नक्षलग्रस्त भाग यामुळे अजूनही २० टक्के भागात बीएसएनएलची सेवा पोहोचविण्यास अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील भ्रमणध्वनीधारकांना संपर्क साधण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. भारत संचार निगम लिमिटेडने जिल्ह्यात दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवेचे जाळे पसरविण्याचा प्रारंभ केला होता. जिल्ह्यातील ४६७ ग्रामपंचायतच्या १४ हजार ४१२ चौ. किमी क्षेत्रात भ्रमणध्वनी सेवा पसरविण्यास बीएसएनएलला अजूनही यश प्राप्त झाले नाही. सद्यस्थितीत बीएसएनएलच्यावतीने जिल्ह्यात ३२ ठिकाणी टेलिफोन एक्स्चेंज कार्यालय सुरू करण्यात आले आहे. एसटीडी सेवा असलेले ३२ केंद्र आहेत. दूरध्वनी जोडणीची क्षमता जिल्ह्यात १८ हजार ९६८ एवढी आहे. त्यापूर्वी ४ हजार ८४८ दूरध्वनी जोडणी कार्यरत आहेत, अशी माहिती आहे. जिल्ह्यात ७ हजार ७५० तरंग सेवेचे ग्राहक आहेत. एकंदरीत १ लाख ७२ हजार ७५९ बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेचे ग्राहक आहेत. यामध्ये १ लाख ७१ हजार ७५२ प्रिपेड कार्डधारक तर १ हजार ७ पोस्टपेड भ्रमणध्वनीधारक आहेत. जिल्ह्यात भ्रमणध्वनी सेवेचे जाळे विस्तारण्यासाठी दुर्गम भागात मोबाईल टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जलद संपर्क साधण्यासाठी तसेच मोबाईल यंत्रणा सक्षम करण्यासाठी ३७ मोबाईल टॉवर उभारण्यास मंजुरी मिळाली होती. यामध्ये व्यंकटापूर, राजाराम खांदला, देचलीपेठा, दामरंचा, मरपल्ली, लाहेरी, कोठी, ताडगाव, धोडराज, नारगुंडा, कारवाफा, गट्टा, फुलबोडी, सावरगाव, येरकड, पेंढरी, गोडलवाही, हालेवारा, गट्टा जांभिया, जारावंडी, होड्री, येमली, बुर्गी, ग्यारापत्ती, कोटगुल, कसनसूर, झिंगानूर, पोटेगाव, बोलेपल्ली, रेगुंठा, पुराडा, रेगडी, मन्नेराजाराम, मुंगनेर, मसेली, कोटमी, बेडगाव, भामरागड, सोबीर आदी गावांचा समावेश आहे. यापैकी नऊ टॉवर उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. याव्यतिरिक्त सातव्या टप्प्यांतर्गत नव्याने ४० मोबाईल टॉवरच्या बांधकामास परवानगी मिळाली आहे. यात अहेरी तालुक्यातील येलचील, वेलगुर, गुड्डीगुडम, तलवाडा, मेडपल्ली, चंद्र, महागाव बु., उमानूर, आलापल्ली, जिमलगट्टा यांचा समावेश आहे. भामरागड येथे टॉवर उभारले जाणार आहे तसेच चामोर्शी तालुक्यातील इल्लूर, नेताजीनगर, मार्र्कंडादेव, जामगिरी, अडपल्ली चक, मार्र्कंडा (कं.), चामोर्शीचा समावेश आहे. धानोरा तालुक्यात मेंढाटोला व धानोरा येथे मोबाईल टॉवर उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. एटापल्ली तालुक्यातील बेरडी, जव्हेली बु., एटापल्लीचा समावेश आहे. गडचिरोली येथे आरमोरी मार्ग, गोकुलनगर, कारगील चौक, रेड्डी गोडाऊन चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय व गिलगाव येथे मोबाईल टॉवर उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कोरची तालुक्यात कोरची, बेडगाव, कुरखेडा तालुक्यात येंगलखेडा, मुलचेरा तालुक्यात खुदीरामपल्ली, गोमणी, कोपरअल्ली, सिरोंचा तालुक्यात पेंटीपाका, अंकिसा माल, सिरोंचा माल, वडधम व देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे मोबाईल टॉवरचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
दुर्गम भागात भ्रमणध्वनी ठप्प
By admin | Updated: July 21, 2014 23:52 IST