गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी आवश्यक आहे. दारूबंदी उठविल्यास विदेशी दारू गावात शिरकाव करेल. आरोग्याच्या प्रश्नासह गरिबी निर्माण होईल. तसेच ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे, अन्यथा संपूर्ण गावाचा विकास खुंटणार. त्यामुळे दारूमुक्त निवडणूक करा, असे आवाहन डॉ. आनंद बंग यांनी तोडसा इलाक्यातील समाविष्ट ४२ गावांना केले आहे.
तोडसा येथे इलाका बैठकीत ते बोलत होते. यावेळी इलाका प्रमुख अध्यक्ष अडवे गाडवे, ताेडसाचे गाव पाटील रैजी गावडे, साई गावडे, तोडसा सरपंच प्रशांत आत्राम, मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार, तोडसा पट्टी इलाक्यातील ४२ गावातील गाव पाटील व भूमय्या उपस्थित होते.
यावेळी डॉ. आनंद बंग यांनी उपस्थित गाव पाटील व भूमय्या यांना जिल्हा दारूबंदी, दारूमुक्त निवडणुकीचे महत्त्व पटवून दिले, सोबतच वनहक्क कायद्याचीसुद्धा माहिती दिली. वनहक्क कायद्यांतर्गत विविध योजना गावापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तलाव खोलीकरण व शेतीला सुपीक करणे आदी योजनांची माहिती देत डॉ. आनंद बंग यांनी तोडसा इलाक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.