शेतकरीवर्ग सुखावला : रोवणीच्या कामाला झाली आहे सुरुवातगडचिरोली : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी रात्री जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले. सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात अहेरी तालुक्यात सर्वाधिक ६८.८ मिमी पाऊस झाल्याची नोंद गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाने घेतली आहे. जून महिन्यात १९ ते २३ या काळात जिल्ह्यात पाऊस झाला होता. त्यानंतर महिनाभर पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले धान पऱ्हे कडक उष्णतामानामुळे वाळून जाण्याच्या मार्गावर होते. अशातच जुलै महिन्यात २२ तारखेला बुधवारी रात्री दमदार पावसाचे आगमन झाले. गुरूवारी सकाळी ८ वाजतापर्यंत गडचिरोली तालुक्यात २४.२ मिमी, धानोरा तालुक्यात १३, चामोर्शी तालुक्यात ५२, मुलचेरा तालुक्यात ५२.२, देसाईगंज तालुक्यात ४१.४, आरमोरी तालुक्यात ९.८, कुरखेडा तालुक्यात १, कोरची तालुक्यात २, अहेरी तालुक्यात ६८.८, एटापल्ली तालुक्यात ३२.६, सिरोंचा तालुक्यात ४० मिमी पावसाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षाने घेतली आहे.बुधवारी मोठा पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी धान रोवणीच्या कामाला सुरुवात केली. आजच्या पावसामुळे शेतऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र धानपिकाचे रोवणे पुढेही सुरू राहण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. नदी, नाले अजूनही कोरडेच आहेत. तलावामध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाणी साचले नाही. काही शेतकऱ्यांनी मात्र अजूनपर्यंत रोवणीच्या कामाला सुरुवातच केली नाही. (प्रतिनिधी)
अहेरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस
By admin | Updated: July 24, 2015 01:38 IST