गडचिरोली : नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांच्या वृध्द पित्याचा सरकारकडून मिळणाऱ्या मोबदल्यासाठी गेल्या साडेपाच वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष थांबणार कधी ? हाच प्रश्न निर्माण झाला आहे. आपला मुलगा शहीद झाला. त्याला मिळणारे लाभ कधी मिळतील हे विचारण्यासाठी चोपचे दादाजी चहांदे हे सरकारच्या गृहखात्याची विविध कार्यालये दररोज पालथी घालत आहे. परंतु अजुनही गृहविभागाच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. एकीकडे मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याच्यावर शासनाने कोट्यावधी रूपयाचा खर्च केला. मात्र जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या आपल्या मुलाचे वेतनही अजुन शासनाने दिले नाही. सवलती लागू करण्याचा प्रश्नच गेल्या साडेपाच वर्षापासून प्रलंबित आहे. दादाजी चहांदे आपली व्यथा सांगताना म्हणाले की, मुलगा भगवान चहांदे हा गडचिरोली पोलीस दलात २००७ मध्ये दाखल झाला होता. १६ एप्रिल २००९ रोजी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी पार पाडत असताना बंदूकीच्या गोळ्या लागून तो शहीद झाला. त्याच्या भरवश्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती. तो पोलीस दलात आहे म्हणून एक बहिण व एका भावाला उच्च शिक्षण द्यावे, त्याचा खर्च मी उचलेन असे भगवान म्हणायचा. म्हणून दोघाही भावंडांना एमबीबीएसच्या शिक्षणासाठी नागपूरला प्रवेश दिला. परंतु २००९ मध्ये भगवान गोळी लागून शहीद झाला. राज्य सरकारच्या पोलीस विभागाने त्याला शहीदाचा दर्जा दिला. मानवंदना दिली व मला सानुग्रह मदत म्हणून २० हजार रूपये मुलाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दिले. पण पुढे मात्र काहीच मदत मिळाली नाही. २००९ पासून शहीदांना मिळणारे लाभ, नियमित पगार, विशेष वेतन आदी मिळालेले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयातून १० लाखाऐवजी ५ लाखाची विमा रक्कम देण्यात आली. कमावता मुलगा गमाविल्यामुळे आता कुटुंब चालविण्यासोबतच दोन मुलांचा उच्च शिक्षणाचा खर्च करताना मला कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. परिचर म्हणून काम करणाऱ्या माझ्यासारख्या गरीब माणसाने मुलाच्या हक्काच्या लाभासाठी आणखी किती दिवस संघर्ष करायचा, असा त्यांचा सवाल आहे. परंतु लालफितशाहीत त्यांच्या मुलाच्या मोबदल्याची केस कुठे अडकली, हे सांगायलाही गृहखात्याचे अधिकारी तयार नाही. तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांचीही अनेकदा भेट घेतली. परंतु ते अधिकाऱ्यांकडे बोट दाखवितात, असा अनुभव चहांदे यांना आला. दरम्यान ५ जानेवारी २०१३ रोजी गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी राज्याच्या गृहमंत्रालयाचे अवर सचिव यांना पत्र लिहून शहीद जवान भगवान दादाजी चहांदे यांच्या कुटुंबाला संपूर्ण आर्थिक मदत द्यावी, अशी विनंती केली. परंतु अजुनही गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. यापूर्वी विधान परिषद सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही या प्रकरणाबाबत पत्र दिले होते. त्या पत्राला ९ जून २०११ ला गृहमंत्र्यांनी उत्तर दिले व सदर प्रकरण उप सचिव गृहविभाग यांच्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे. परंतु अजुनपर्यंत शहीद जवान चहांदे यांच्या कुटुंबियांच्या पदरात एक कवडीही पडलेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
शहीद जवान भगवान चहांदेच्या कुटुंबाची शासनाकडून उपेक्षा
By admin | Updated: December 10, 2014 22:56 IST