कारवाईची मागणी : ग्रामसेवक एक महिन्यापासून गैरहजरआलापल्ली : भामरागड -आलापल्ली मार्गावरील पेरमिलीजवळ असलेल्या मेडपल्ली येथील ग्रामसेवक हे मागील एक महिन्यापासून सतत गैरहजर असल्याने प्रशासकीय काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. सदर ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी मेडपल्लीवासीयांनी केली आहे. मेडपल्ली ही गटग्रामपंचायत असून या ग्रामपंचायती अंतर्गत वेडमपल्ली, कासनपल्ली, गुर्जा, कोरेली (खु.), कोरेली (बु.), तलबाडा व मेडपल्ली ही आठ गावे येतात. ही संपूर्ण गावे अतिशय दुर्गम असून या गावात आदिवासी नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतीसाठी लागणारे कर्ज व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीचा दाखला असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दहावी, बारावीेचे निकाल लागले आहेत. या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र काढावे लागते. हे सर्व दाखले काढण्यासाठी ग्रामसेवकाकडून मिळणाऱ्या दाखल्यांची गरज भासते. सदर दाखले घेण्यासाठी नागरिक मेडपल्ली येथे जातात. त्यावेळी ग्रामसेवक उपस्थितच राहत नाही. परिणामी नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. ग्रामसेवकाचे या गावांकडे दुर्लक्ष होत असल्याने गावात होणारी विकासकामेही थांबली आहेत. २७ जून २०१४ पासून येथील ग्रामसेवक सतत गैरहजर आहेत. याबाबत नागरिकांनी अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र ग्रामसेवकांवर संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाहीे. नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. संपूर्ण नाल्या गाळाने तुडुंब भरल्या आहेत. मागील अनेक महिन्यापासून गावातील पथदिवे बंद आहेत. सामाजिक कार्यकर्ते कैलास कोरेत व सरपंच सतिश वेलादी यांच्या मार्गदर्शनात ग्रा.पं. सदस्य भगवान मडावी, माजी सरपंच बाबुराव वेलादी, घिसू वेलादी, निलेश वेलादी, सिताराम मेश्राम, नरसिंह कोडापे, विलास तलांडे, लक्ष्मण मडावी, मोतीराम पेंदाम यांनी बीडीओंना निवेदन देऊन ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी केली. अन्यथा सात दिवसानंतर ग्रा.पं.ला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.
मेडपल्लीचे कामकाज ठप्प
By admin | Updated: July 21, 2014 23:51 IST