गडचिरोली : विविध वयोगटातील ७० टक्के महिलांमध्ये पाठीचे आजार आढळून येतात. यामुळे महिलांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी वेळीच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. नियमितपणे २० ते २५ मिनिटे व्यायाम हा यावर चांगला उपाय असून त्यामुळे निरोगी राहण्यास मदत होऊ शकते, असे प्रतिपादन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सतीश मेश्राम यांनी केले.गडचिरोली येथे लोकमत सखी मंचच्या वतीने आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात ते बुधवारी बोलत होते. लोकमतचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्ज्वललाने या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला आरोग्याच्या उपचार तज्ज्ञ डॉ. हिरा वाघमारे, भौतिक उपचार तज्ज्ञ डॉ. उज्ज्वल मोरे उपस्थित होते. यावेळी लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका प्रीती मेश्राम उपस्थित होत्या. डॉ. मेश्राम यांनी महिलांना होणाऱ्या विविध आजाराची माहिती दिली. डोक्यापासून पायापर्यंत महिलांना होणारे विविध आजार व त्यामुळे महिला आरोग्यावर होणार परिणाम यावर त्यांनी अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले. चाळीशीनंतर आरोग्याची नियमितपणे काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. मणक्याचे आजार हे महिलांना मोठ्या प्रमाणावर होतात. ७० टक्के महिला या आजारामुळे ग्रस्त आहेत, असेही आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या आजाराची काळजी घेण्याबाबत आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाला डॉ. हिरा वाघमारे यांनी यावेळी चुकीच्या जीवनचर्येमुळे अनेकदा आजारांना निमंत्रण मिळते. शरीरातील जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुंग्या येणे, हॉर्मोन्स बदल आदी रोग होतात. व्यायामाचा अभाव याला कारणीभूत आहे. नियमितपणे व्यायाम केल्यास या सर्व व्याधींवर मात करता येऊ शकते, असे त्या म्हणाल्या. डॉ. उज्ज्वल मोरे यांनी महिलांना होणारे आजार व त्यावर मात करण्यासाठी कोणकोणत्या व्यायामाची आवश्यकता आहे. ते कसे केले जातात, यावर मार्गदर्शन केले. महिलांच्या विविध शारीरिक, मानसिक आजारांबाबत त्यांनी यावेळी उपस्थित सखी मंच सदस्यांना माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन सुनीता उरकुडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रीती मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला लोकमत युवा नेक्स्टच्या संयोजिका वर्षा पडघन, बाल विकास मंचच्या संयोजिका किरण पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारती खोब्रागडे, मृणाल उरकुडे, अर्चना भांडारकर, उज्वला साखरे, शारदा खंडागळे, रोहिणी मेश्राम यांनी सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
२० ते २५ मिनिटांचा व्यायाम ठेवू शकतो निरोगी
By admin | Updated: July 23, 2015 01:27 IST