बौध्द समाजाचा मेळावा : सामूहिक विवाह सोहळ्याची गरज असल्याचा मान्यवरांचा सूर आरमोरी : जेतवन बौध्द समाज विकास मंडळ आरमोरीच्या वतीने स्थानिक मंगल कार्यालयात रविवारी बौध्द समाज उपवर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बौध्द समाजातील ७५ वर व ६२ वधू अशा एकूण १३७ जणांनी परिचय देऊन भावी जिवनाविषयी आपले मत प्रकट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रोहिदास राऊत होते. उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे तर प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी विचारवंत मारोतराव कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद गवई, सामाजिक कार्यकर्त्या शालिनी गेडाम, यशवंत जांभुळकर, किशोर सहारे, प्रभाकर टेंभुर्णे, प्रा. प्रकाश दुधे, पी. के. सहारे, हंसराज बडोले, जगदिश रामटेके आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. बौध्द समाज मंडळाने सामुहिक विवाह मेळाव्याची संकल्पना राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन रोहिदास राऊत यांनी यावेळी केले. प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे यांनी वधू-वर परिचय मेळाव्यासारख्या उपक्रमाची समाजामध्ये नितांत गरज आहे, असे सांगितले. याप्रसंगी जेतवन बौध्द समाज मंडळातर्फे मारोतराव कांबळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक हंसराज बडोले, संचालन प्रा. अमरदीप मेश्राम यांनी केले तर आभार केशव बांबोळे यांनी मानले. विदर्भातील बौध्द समाजातील वर-वधू व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. (वार्ताहर)
आरमोरीत १३७ उपवर-वधूंनी दिला परिचय
By admin | Updated: December 26, 2016 01:28 IST