आरमोरी : लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर सुट्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील अनेक कर्मचारी बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधून येथील बर्डी विद्यानगर परिसरात तब्बल आठ कर्मचाऱ्यांच्या घरी घरफोडी करून ४० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. विद्यानगर बर्डी येथील सुनिल गेडाम यांच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून खोलीमध्ये प्रवेश केला. आतील कपाट तोडून त्यातील १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, तीन ग्रॅमचा सोन्याचा लॉकेट, चांदीची १६० ग्रॅमची चाळ असा एकूण ४० हजारांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी गेडाम यांच्या घरी राहत असलेल्या कटरे यांच्या निवासस्थान, मुख्याध्यापक झोडे, शिक्षक पांडुरंग धोटे, श्रीनिवास हुकरे, नरेंद्र मुल्लेवार, मार्तंड मायमूर्ती तसेच औषधी सहायक साळवे आदी सात कर्मचाऱ्यांच्या घरी प्रवेश करून कपाट तोडले. मात्र येथून चोरट्यांच्या हाती रोकड लागली नाही. भांडे व चिल्लर पैसे लंपास केले. सकाळी सदर घटना माहिती होताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. १३ नोव्हेंबरला येथे पाच घरफोड्या झाल्या. (प्रतिनिधी)तब्बल चार तासांनी पोहोचले पोलीस४घरफोडी झाल्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी आरमोरीच्या पोलीस ठाण्याला दूरध्वनीवरून दिली. मात्र सदर घटनेचे गांभिर्य ओळखून आरमोरी पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले नाही. तब्बल चार तासानंतर आरमोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान येथील काही नागरिकांनी पोलिसांना उशीरा आल्याबाबत विचारणा केली असता, उलट एका पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी हुज्जत घातली. या घटनेसंदर्भात आरमोरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भादंविचे कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोड्या
By admin | Updated: November 17, 2015 02:47 IST