वैरागड : गडचिरोली जिल्हा निसर्ग सौंदर्यांनी नटलेला आहे. या जिल्ह्यात अनेक रमणीय ऐतिहासिक तीर्थस्थळे आहेत. जिल्हा निर्मितीपासून या स्थळांचे सौंदर्या फुलविण्यास मुळीच प्रयत्न झाले नाही. तीर्थस्थळांच्या सौंदर्याकडे पाहिले असता, जिल्ह्यातील सर्वच तीर्थस्थळे उपेक्षित असल्याचे दिसून येते. वैनगंगा, वर्धा, दिना, प्राणहिता, पामुलगौतम, पर्लकोटा, इंद्रावती यासारख्या प्रसिद्ध नद्या असून हिरव्यागार वनश्रीने गडचिरोली जिल्ह्याच्या सौंदर्यात निसर्गाने अधिकच भर टाकली आहे. तीर्थस्थळाप्रमाणे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सौंदर्यस्थळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. बिनागुंडाचा धबधबा, टिपागड, चपराळा, अरततोंडी आदी स्थळे अत्यंत रमणीय आहेत. जिल्ह्यात इंद्रावती, गोदावरी व प्राणहिता नदीचा संगम आहे. या त्रिवेणी संगमाला भेट देऊन सौंदर्य न्याहाळण्यासाठी जिल्हाबाहेरील पर्यटकांची नेहमीच गर्दी होते. वैरागडचा किल्ला, भंडारेश्वर मंदिर आदीसह अनेक ऐतिहासिक महत्वपूर्ण स्थळे आहेत. निसर्गाने भरभरून दिलेल्या या जिल्ह्याच्या सौंदर्याकडे जिल्हानिर्मितीच्या ३२ वर्षांपासून कायम दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. या तीर्थस्थळांकडे नजर टाकली असता, अत्यंत दुर्दशा झाली असल्याचे दिसून येते. भाजप-सेना प्रणीत नव्या सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक व तीर्थस्थळांच्या विकासाकरिता ठोस कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. तसेच सौंदर्य विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तेव्हाच जिल्ह्यातील ऐतिहासिक व तीर्थस्थळांचे सौंदर्य वाढेल. परिणामी पर्यटन विकास व रोजगारही निर्माण होईल. (वार्ताहर)
ऐतिहासिक तीर्थस्थळे उपेक्षितच
By admin | Updated: December 13, 2014 22:38 IST