हेमंत गेडाम लोकमत न्यूज नेटवर्कलगाम : गडचिरोली-आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ३५३ (सी) च्या बांधकामात विविध कारणांमुळे अडथळा येत आहे. सदर महामार्ग चामोर्शी-आष्टीच्या पुढे झाले असले तरी लगाम ते आलापल्लीदरम्यानचे काम पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सेटिव्ह झोन) मुळे रखडले आहे. या मार्गाच्या निर्मितीत आणखी किती अडथळे आहेत? असा सवाल नागरिकांचा आहे.
गडचिरोली-आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या उन्नतीकरणाचे काम सुरू आहे; परंतु लगाम ते आलापल्ली या १७ किमी परिसरात चपराळा अभयारण्य येते. हा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (ईएसझेड) व इस्टर्न विदर्भ लैंडस्कॅप (ईव्हीएल) म्हणजेच वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचा संचार असलेला आहे. यामुळे सदर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी वनविभागाची अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही.
धुळीमुळे श्वसनाचे विकारराष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे सतत धूळ उडते. हीच धूळ श्वसनमार्गात जाते. यामुळे विविध विकार बळावत आहेत. याशिवाय दिवसरात्र वाहनांच्या वर्दळीमुळे गोंगाट असतो. गोंगाटामुळे नागरिकांची झोपमोड होते.
'ईएसझेड' प्रभावित मार्ग, मंजुरी मिळेनालगाम- आलापल्लीपर्यत १७किमीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी एकूण ५४.२७४ हेक्टर जंगल क्षेत्राचे वळण (डायव्हर्जन) प्रस्तावित करण्यात आले होते. या अंतर्गत पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने स्टेज-१ ला २१ नोव्हेंबर २०२३ रोजी मंजुरी दिली. त्यानंतर कार्य परवानगी २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मिळाली; परंतु ही परवानगी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आणि वन्यप्राणी संचार मार्ग वगळून दिली होती.
"अवजड वाहनांमुळे राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असल्याने लगाम परिसरातील नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात ही स्थिती आणखी बिकट होऊ शकते."- दीपक मडावी, सरपंच, लगाम