प्रशासनाची तयारी सुरू : २९९ ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकागडचिरोली : मे महिन्यात जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या महिन्यात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असून त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. तर गावातील वातावरण आतापासूनच तापायला सुरूवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उतरंडीतील सर्वात शेवटचा घटक म्हणून ग्रामपंचायतीची ओळख असलेली तरी भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांचा विकास करण्याची ताकद ग्रामपंचायतमध्ये आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जात आहे. भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाचा निधी सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये जमा करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे व या पैशाचा विनियोग करण्याचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्व आणखी वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ४६७ ग्रामपंचायती आहेत. यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणूका २०१० साली पार पडल्या होत्या. यातील २९९ ग्रामपंचायतीची मुदत मे महिन्यात संपत आहे. मुदत संपताच नवीन सदस्यांची निवड होण्याच्या उद्देशाने निवडणूक प्रशासन कामाला लागले आहे. या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका मे महिन्यातच घेण्यात याव्या, अशा स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या व्यतिरिक्त जुलै महिन्यात २८, आॅगस्ट महिन्यात दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एका मतालाही अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आधी १८ वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक युवक नोंदणी करणार आहे. त्यादृष्टीने नवीन मतदारांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम आखला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती नक्षलग्रस्त भागात मोडतात. नक्षल्यांचा लोकशाहीस विरोध असल्याने नक्षली निवडणुकीच्या कालावधीत घातपात करण्याच्या उद्देशाने योजना आखतात. त्याचबरोबर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरणही निर्माण करतात. नक्षल्यांच्या या कारवायांना न जुमानता भयमुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्या उद्देशाने येथील निवडणूक व पोलीस प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे प्रशासनसुध्दा आताच कामाला लागले आहे. राजीनामा सत्रामुळेही ग्रा.पं.च्या जागा रिक्त राहतात. (नगर प्रतिनिधी)
मे मध्ये ग्रा.पं. रणसंग्राम
By admin | Updated: February 1, 2015 22:55 IST