आॅक्टोबरनंतर अहवालच गेला नाही : मेमध्ये पुन्हा गणना करणार; नगर पालिका क्षेत्रातील रोपांची अवस्था वाईटच गडचिरोली : विविध शासकीय, निमशासकीय व सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून करण्यात आलेल्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमानंतर शासनाकडे लावलेल्या व जिवंत असलेल्या झाडाच्या अहवालाची माहिती आॅक्टोबर २०१६ मध्ये देण्यात आली होती. मात्र त्यानंतर शासनाकडे याबाबतचा कोणताही अहवाल पाठविण्यात आला नाही. आगामी मे महिन्यामध्ये पुन्हा गेल्यावर्षीच्या वृक्षाची गणना करून अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे विविध यंत्रणांनी लावलेले किती रोपे सद्य:स्थितीत जिवंत आहेत, ही बाब गुलदस्त्यातच आहे. जुलै २०१६ मध्ये लावण्यात आलेल्या वृक्षाची आॅक्टोबर २०१६ मध्ये माहिती घेऊन अहवाल पाठविण्यात आला. या अहवालात बऱ्याच शासकीय यंत्रणांनी ९५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे सरकारला कळविले. त्यामुळे आता मे महिन्याच्या अहवालावर पुढची भिस्त अवलंबून राहणार आहे. देसाईगंज तालुक्यात २०१६-१७ या वर्षात ९० हजार रोपांची लागवड करण्यात आली. आॅक्टोबर २०१६ पर्यंत ८८ हजार रोेपे जिवंत असल्याची माहिती देण्यात आली होती. आता किती रोपे जिवंत आहेत, याची माहिती वन विभागाकडे नाही. मे महिन्यात गणना होणार आहे. तेव्हा माहिती कळेल, असे वन विभागाच्या सूत्रांनी लोकमतला सांगितले. देसाईगंज नगर पालिकेला २ हजार रोपांच्या लागवडीचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यांनी १ हजार रोपांची लागवड केली. एक हजार शहरातील शाळा व महाविद्यालयांना देण्यात आली. त्यापैकी १ हजार ५४४ रोपे जिवंत असल्याचे आॅक्टोबर २०१६ च्या अहवालात नमूद करण्यात आले होते. सद्य:स्थितीत नगर पालिकेकडे गतवर्षीच्या वृक्षारोपणातील रोपांच्या स्थितीची माहिती उपलब्ध नाही. पंचायत समितीनेही महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शंकरपूर व शिवराजपूर ग्राम पंचायतींना २ हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम दिला. त्यापैकी १ हजार ९६८ वृक्ष जिवंत असल्याचे सांगण्यात आले. ही सर्व माहिती कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात वृक्षारोपण करण्यात आलेल्या जागेवर वृक्षच राहिलेले नाही. पाण्याचा अभाव, वृक्ष जगविण्यासाठी करावयाचे नियोजन यामुळे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे सध्या बारा वाजले आहे. देसाईगंज नगर पालिकेच्या हद्दीत बोटावर मोजण्याइतकेच रोपटे जिवंत राहिलेले आहे. दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली नगर पालिकेच्या वतीने जुलै महिन्यात एकूण १ हजार ६५० रोपे आयटीआय बायपास रोड, गोकुलनगर, खरपुंडी मार्गावरील घनकचरा व्यवस्थापन परिसर, शहराच्या अनेक वॉर्डातील ओपन स्पेस व रस्त्याच्या कडेला लावण्यात आले. यापैकी ९५० म्हणजे ५७ टक्के वृक्ष जिवंत आहेत, असे दोन महिन्यापूर्वी पालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले, अशी माहिती न. प. प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र गडचिरोली शहरात पाहणी केली असता, संरक्षण कठड्याअभावी निम्मे वृक्ष नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून रोपवाटिकेतून १ लाख १० हजार रूपये किंमतीच्या रोपांची खरेदी केली होती. तर काही रोपे सामाजिक वनीकरण विभागाकडून मिळविली होती. सर्वेक्षणानंतर दोन ते अडीच महिन्यात उष्णतामानाने पुन्हा बरीचशी रोपे करपली असल्याचे दिसून येत आहे. एकूणच वृक्ष लागवडीची शहरी भागात बोजवारा उडाला आहे.
सरकारी अहवालात जिवंत वृक्षांची माहिती गुलदस्त्यातच
By admin | Updated: April 27, 2017 01:11 IST