१४ गावांच्या शेतकऱ्यांची बैठक : पाणी समस्या सोडविणार -नेते घोट : चापलवाडा परिसरातील १४ गावातील पाण्याची समस्या सोडविण्याबाबत खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे २४ एप्रिलला बैठक घेण्यात आली. मुख्य कालव्याचे पाणी उंच भागात अडवून उपकालव्याद्वारे पाणी पुरवठा करून सिंचन सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. खा. अशोक नेते यांनी १४ गावाची पाण्याची समस्या सोडविली जाईल, असे आश्वासन दिले. चापलवाडा परिसरातील १४ गावांच्या शेतीला पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव सिंचन प्रकल्प असलेल्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावालगतच्या दिना नदीवर असलेल्या कन्नमवार जलाशयाचे पाणी धरणाद्वारे तालुक्यातील ६६ गावातील शेतीला प्राप्त होते. परंतु याच धरणालगतच्या चापलवाडा, चनकापूर, मकेपल्ली, गोलबंदरी, गालबोदरी, गांधीनगर, वरूर, पुसगुडा, पलसपूर, पोतेपल्ली, माडेआमगाव, सिमुलतला, श्यामनगर, कोळसेगट्टा, मच्छली आदी १४ गावातील शेतीला धरणाचा पाणीपुरवठा होत नसल्याने या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. परिसरातील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळते. परंतु १४ गावातील शेतीला पाणी मिळत नसल्याने अनेक वर्षांपासून शेतकरी पाणी मिळावे, याकरिता लढा देत आहेत. दुष्काळाचा सामना करावा लागू नये, याकरिता मुख्य कालव्याचे पाणी उंच भागात अडवून नवीन उपकालव्याद्वारे पाणीपुरवठा करून सिंचन सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी १४ गावातील शेतकऱ्यांनी खा. अशोक नेते यांच्याकडे बैठकीत केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जि. प. सदस्य रंजीता कोडापे, भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र ओल्लालवार, भाजप महिला आघाडीच्या रेखा डोळस, गडचिरोलीचे न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भारत खटी, संगीता पिल्लारे, रूमाजी भांडेकर, चापलवाडाचे सरपंच रमेश लेकलवार, दशरथ कांदो, रामटेके, गोपीनाथ बांकवार, सुनील दुंदलवार, केशव खोब्रागडे, गणेश कांदो उपस्थित होते. (वार्ताहर)
उपकालव्याद्वारे पाणी द्या
By admin | Updated: April 27, 2017 01:16 IST