शहीद घोषित करा : अनिल खेवले यांची मागणीगडचिरोली : नक्षलग्रस्त भागात पोलिसांप्रमाणेच पोलीस पाटीलसुद्धा अत्यंत जोखीम पत्करून काम करतात. त्यामुळे त्यांना पोलिसांप्रमाणेच दीडपट मानधन देण्यात यावे व हत्येनंतर शहिदाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गडचिरोलीचे पोलीस पाटील अनिल खेवले यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. पोलीस पाटील म्हणून कर्तव्य बजावित असतांना १९८३ ते २०१४ पर्यंत सुमारे ३० पोलीस पाटलांच्या हत्या करण्यात आल्या. नक्षल्यांकडून हत्या झालेल्या पोलीस पाटलाच्या कुटुंबियांना २००४ पर्यंत १० हजार रूपये व २००५ पासून दीड लाख रूपयाची मदत देण्यात येत आहे. शहीद पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाला एक कोटी रूपयाची मदत देण्यात येते, शासकीय सेवेत नोकरी, शहिदांच्या मुलांना शिक्षणाची सोय करून देण्यात येते. पोलिसांप्रमाणेच पोलीस पाटीलसुद्धा जोखमीचे काम करीत असल्याने त्यांच्या हत्येनंतर त्यांना शहीद म्हणून घोषित करून १० लाख रूपयांची मदत त्याच्या कुटुंबियाला द्यावी व मुलाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी खेवले यांनी केली आहे. आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांना शासनाकडून ६ लाख रूपयाचे अनुदान दिल्या जात आहे. याशिवाय महिन्यापोटी आवश्यक तेवढे अर्थसहाय्यसुद्धा देण्यात येते. राहण्यासाठी घर व काही प्रमाणात शेतीसुद्धा देण्यात येते. आत्मसमर्पीत नक्षल्यांएवढीसुद्धा मदत पोलीस पाटलाला दिली जात नाही. त्यामुळे पोलीस पाटील पदाचा कारभार सांभाळण्यास नागरिक तयार नसल्याने अनेक गावातील पोलीस पाटीलाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्या गावची शांतता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य पोलीस पाटील असोेसिएशनचे अधिवेशन २० फेब्रुवारी रोजी पैठण येथे पार पडले होते. या बैठकी गृहमंत्र्यांनी हत्या झालेल्या पोलीस पाटलाला शहिदाचा दर्जा देऊन त्याच्या कुटुंबियाला १० लाख रूपय मदत, मुलाला शासकीय नोकरी, दीडपट मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची परिपूर्ती करण्यासाठी शासन निर्णय काढावा, अशी मागणी े पोलीस पाटील अनिल खेवले यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
पोलीस पाटलांना दीडपट मानधन द्या
By admin | Updated: July 3, 2014 23:35 IST