लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : येथील वडसा मार्गावरील वन विभागाच्या जैवविविधता उद्यान व नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला धूलिवंदनाच्या दिवशी आग लागली होती. या आगीत उद्यानातील दुर्मीळ आणि मौल्यवान वनौषधींची झाडे व बगीचा जळाला, तसेच कचरा डेपोतील प्लास्टिक कचऱ्याचे ढीग जळून खाक झाले. मात्र, या प्रकरणाची चौकशी अजूनही थंडबस्त्यात आहे.सदर आग ही मानवनिर्मित असून, ती अज्ञात इसमाने लावलेली असल्याचा संशय संबंधित विभागाला आहे. आग लागण्यामागे कुणाचा हात आहे व आग लावण्याचा हेतू काय? याचा शोध संबंधित विभागाने अद्याप घेतला नाही. त्यामुळे जळीत प्रकरणातील आरोपीचा सुगावा अजून लागलेला नाही. वन विभाग व नगर परिषद प्रशासनाने याबाबत कुठलीच कार्यवाही केली नाही. १५ दिवसांचा कालावधी लोटूनही जळीत प्रकरणामागील रहस्य उलगडलेले नाही. वडसा रोडलगतच्या या जैवविविधता उद्यानात चार- पाच वर्षांपूर्वी विविध जातींची दुर्मीळ वनौषधींची झाडे, बांबू, फळे व फुलांची झाडे आणि बगिचा लावण्यात आला होता. हे उद्यान तयार करताना शासनाचे लाखो रुपये खर्च झाले. मात्र, अलीकडच्या काळात सदर उद्यानाचे काम रखडले होते, उद्यानाची देखभाल करणे गरजेचे होते; परंतु आरमोरी वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. चौकीदार ठेवले असते, तर उद्यानाला आग लावण्याची हिंमत कुणी केली नसती आणि शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले नसते. मौल्यवान वनसंपदाही जळून खाक झाली नसती; परंतु सदर बाबीकडे अधिकाऱ्यांनी फारसे लक्ष दिले नाही. आरमोरी- वडसा रस्त्यालगत जैवविविधता उद्यानाच्या जवळ नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन केंद्र आहे. याही केंद्राला एकाच वेळी आग लावण्यात आली. यामध्ये तेथील प्लास्टिकचा कचरा जळून खाक झाला. सदर कचरा डेपोत ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण झाले होते. तिथे पाण्याची व्यवस्था होती काय? तिथे कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीचा प्रकल्प असल्याने कुणी चौकीदार होते का, आदी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जैवविविधता उद्यान व घनकचरा डेपोला आग लागल्याच्या घटनेला १५ दिवसांचा कालावधी होत आहे. मात्र, आग लावणारा अज्ञात इसम अद्यापही सापडला नाही. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोन्ही घटनांतील आरोपींचा शोध लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे. याबाबत आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार यांनी या प्रकरणाची चाैकशी सुरू असून अद्याप आराेपीचा शाेध लागला नसल्याचे सांगितले. न.प.चे अभियंता नितीन गाैरखेडे यांनी पाेलिसांनी तक्रार नाेंदवून घेतली नसल्याचे सांगितले.
या प्रकरणाची तक्रार एका कर्मचाऱ्यामार्फत आरमाेरी पाेलीस स्टेशनला दिली हाेती. साेबत घटनास्थळाचा पंचनामाही जाेडला हाेता. पण पाेलिसांनी तक्रार दाखल करून न घेता अधिक माहिती मागितली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रारीची प्रत दिली आहे. -माधुरी सलामे,मुख्याधिकारी, न.प.आरमाेरी
तक्रार परिपूर्ण नव्हतीयासंदर्भात पाेलीस स्टेशनला विचारले असता, नगर परिषदेकडून आलेली तक्रार परिपूर्ण नव्हती. त्यामुळे त्यात आवश्यक असलेली माहिती नमूद करून तक्रार पाठविण्याची सूचना करण्यात आली. परंतु नंतर नगर परिषदेकडून तक्रार किंवा माहिती पाेलीस स्टेशनकडे पाठविण्यात आली नसल्याचे ठाण्यातून सांगण्यात आले.