जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगाचा स्फोट झाला आहे. या स्फोटात 16 जवान शहीद झाले.
महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवला भूसुरुंगाचा स्फोट, 15 जवान शहीद
गडचिरोली- जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात 15 जवान शहीद झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने जवानांचं पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे 15 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.तसेच या हल्ल्यात खासगी वाहनाचा चालकही ठार झाला. कुरखेडा ते कोरची मार्गावर 6 किमी अंतरावर जांभुळखेडा गावाजवळ एका ठिकाणी हा स्फोट घडवून आणला, यात वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. पहाटे वाहनांची जाळपोळ होण्याच्या घटनास्थळी एसडीपीओ शैलेश काळे गेले होते. तेथून त्यांनी या पथकाला तातडीने तिकडे पाचारण केले होते. पण पोलिसांचे वाहन उपलब्ध नसल्याने खासगी मालवाहू वाहनाने हे पथक निघाले होते. मुख्यमंत्र्यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सी-60 पथकाचे 15 जवान शहीद झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डीजीपी आणि गडचिरोली एसपींच्या संपर्कात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी या हल्ल्यात 15 जवान आणि गाडीचा चालक शहीद झाल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच दहशतवाद्यांचं कंबरडं सुरक्षा यंत्रणांनी मोडत असल्यानंच त्यांनी जवानांना लक्ष्य केल्याचंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.