गडचिरोली : भाजपा-शिवसेना युतीच्या केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या जनहितविरोधी धोरणाच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी इंदिरा गांधी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान, चारही मार्गावर वाहनांची रांग लागल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली. या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, गडचिरोली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अतुल मल्लेलवार, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेसचे चंद्रपूर येथील ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रेय आदी प्रमुख नेत्यांनी केले. याप्रसंगी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी युती सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. गगनभेदी घोषणेद्वारे सरकारचा निषेध केला. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १० हजार रूपयाची मदत द्यावी, धानाला तीन हजार रूपये भाव व ५०० रूपये बोनस देण्यात यावा, ९ जून २०१४ च्या राज्यपालाच्या अधिसूचनेत सुधारणा करून गैरआदिवासींना न्याय देण्यात यावा, १६ टक्के मराठा आरक्षणातील १३ टक्के आरक्षण गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींना देऊन १९ टक्के आरक्षण पूर्ववत करावे, गडचिरोलीत कृषी विद्यापीठाची निर्मिती करावी, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावे, गडचिरोली-वडसा रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू करावे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गडचिरोलीचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, समशेर पठाण, महासचिव नरेंद्र भरडकर, काशिनाथ भडके, सी. बी. आवळे, पी. टी. मसराम, सुरेश भांडेकर, पंचायत समिती सभापती देवेंद्र भांडेकर, आरमोरी पं.स.चे उपसभापती चंदू वडपल्लीवार, बशीर पिरानी, नंदू वाईलकर, पांडुरंग घोटेकर, शहर अध्यक्ष सुनिल खोब्रागडे, अमिता लोणारकर, सुमेध तुरे, विजय भांडेकर, प्रतिभा जुमनाके, नगरसेवक पुष्पा कुमरे, लता मुरकुटे, राकेश रत्नावार, विजय कांबळे, देसाईगंजचे माजी नगरसेवक शहजाद शेख, संजय वानखेडे आदी उपस्थित होते. काँग्रेसचे आंदोलन असल्याने गांधी चौकात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. (स्थानिक प्रतिनिधी)
काँग्रेसने रोखले चार रस्ते
By admin | Updated: February 9, 2015 23:12 IST