अहेरी : स्थानिक आगारातील बहुतांश बसेस एकामागे एक धावत असल्याने त्यांना प्रवासी मिळणे कठीण जात असल्याने आगाराला नुकसान सहन करावा लागत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. अहेरी उपविभागात प्रवासी वाहनांची संख्या अत्यंत मर्यादित असल्याने येथील जनतेला अहेरी आगारातून सुटणाऱ्या बसेसवरच अवलंबून राहावे लागते. तीन वर्षांपूर्वी अहेरी आगाराची चांगली सेवा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होती. मात्र मागील काही दिवसांपासून येथील नियोजन ढेपाळत असल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी सकाळी ११.४५ वाजता हा प्रकार आलापल्ली बसस्थानकावर दिसून आला. अहेरी आगाराच्या एम. एच. डी. ६८- ८३७ या अहेरी- चंद्रपूर या बसमध्ये केवळ एक प्रवासी बसला होता. एम. एच- ४०- ८८५७ या अहेरी-चंद्रपूर या बसमध्ये दोन प्रवासी एम. एच.- ४०- ५१७३ या अहेरी- नागपूर सुपर बसमध्ये सात प्रवासी तर एम. एच. ८७७० या चंद्रपूर आगाराच्या बसमध्ये केवळ चार प्रवासी बसले होते. या सर्व बसेस आलापल्ली बसस्थानकावर एकामागे एक उपस्थित उभ्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे यातील चार बसेस चंद्रपूरसाठी तर एक बस नागपूरसाठी होती. अहेरीपासून चंद्रपूरपर्यंत एकाच्या मागे एक बसेस धावतील तर त्यांना प्रवासी कसे मिळणार, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे. अहेरी आगारातील नियोजन शून्यतेचा प्रकार यावरून स्पष्ट होते. याच बसस्थानकावर मुलचेराकडे जाणारी बस एक तासापासून आली नव्हती. त्यामुळे प्रवासी या ठिकाणी ताटकळत बसले होते. (तालुका प्रतिनिधी)
एकाच वेळी धावतात चार बसेस
By admin | Updated: June 10, 2015 02:03 IST