आरमोरी वन परीक्षेत्राअंतर्गत पेटतुकूम, मोहटोला, अरसोडा या जंगल परिसरात दारू विक्रेत्यांनी दारू गाळण्याचे अड्डे निर्माण केले आहेत. मात्र, जंगल परिसरात वाघाची दहशत असल्यामुळे गाव संघटनांच्या माध्यमातून अहिंसक कृती करण्यास अडचण निर्माण होत आहे. या संधीचा गैरफायदा उचलत अवैध दारू विक्रेत्यांनी आपला व्यवसाय जोमात सुरू केला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आरमोरीचे आरएफओ डोंगरवार व मुक्तिपथची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत जंगल परिसरातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली. ज्या भागात वाघाची दहशत आहे, त्या परिसरातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे नियोजन करून वन विभागाचे विशेष पथक व मुक्तिपथ तालुका चमू संयुक्तरित्या कृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून वन परिक्षेत्रातील अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आश्वासन आरएफओ डोंगरवार यांनी दिले आहे. यामुळे जंगल परिसरात असलेल्या दारू भट्टया उद्ध्वस्त होऊन अवैध दारू विक्रीचे प्रमाण कमी होणार आहे. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक नीलम हरिनखेडे, उपसंघटक प्रकाश कुनघाडकर उपस्थित होते.
दारूअड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी वन विभाग घेणार पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:35 IST