कुटुंबीयांवर कौतुकाचा वर्षाव : महात्मा गांधी शाळा आरमोरी व राणी दुर्गावती कन्या शाळा गडचिरोलीच्या यशात मानाचा तुरांआरमोरी : दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. गडचिरोली जिल्ह्यातून महात्मा गांधी विद्यालय आरमोरीची रोहिणी प्रकाश मुलमुले ही विद्यार्थिनी ९६.६० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिली आली आहे. या विद्यार्र्थिनीचा मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर वनमाळी यांनी शाळेत कुटुंबीयांसह सत्कार केला. यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार, प्रा. डॉ. के. टी. किरणापुरे, रसायन शास्त्र विभागाचे प्रा. गंगाधर जुआरे, शिक्षिका सुषमा डांगे, प्रा. सुनील चट्टे, नितीन शेंडे व रोहिणीचे आईवडील उपस्थित होते. महात्मा गांधी शाळेच्या यशात रोहिणीने मानाचा तुरा रोवल्याचे संस्थाध्यक्ष किशोर वनमाळी यांनी याप्रसंगी सांगितले. आंबेडकर विद्यालय आरमोरी येथून आठ विद्यार्थी ९० टक्क्याच्यावर गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. हितकारिणी विद्यालय आरमोरी येथूनही आठ विद्यार्थी ९० टक्क्याच्यावर गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थांनी कौतुक केले आहे. (तालुका प्रतिनिधी)गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेत पहिली आलेली राणी दुर्गावती कन्या शाळेची पल्लवी मुकुंदा किरमे हिचा शाळेच्या वतीने सोमवारी सत्कार करण्यात आला. तिला ९६.६० टक्के गुण मिळाले असून संस्थेचे सचिव घनश्याम मडावी, प्राचार्य सिंधू चहांदे, वर्गशिक्षक पी. बी. ठाकरे आदींच्या उपस्थितीत तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचा निकाल ७५.५८ टक्के लागला असून पायल गुरूदास कुळमेथे हिने ८८.६६, स्नेहा कैलाश नैताम ८६.६० टक्के गुण तर कोमल मोरेश्वर गुरनुले ८३.२० टक्के गुण घेऊन शाळेतून अव्वल आल्या आहेत. कॉपीमुक्त अभियान राबविल्या गेल्यामुळे राणी दुर्गावती कन्या शाळेची मुलगी जिल्ह्यात प्रथम येऊ शकली. यासाठी शिक्षकांनी घेतलेले परिश्रम कामी आले, अशी प्रतिक्रीया प्राचार्य सिंधू चहांदे यांनी यावेळी व्यक्त केली. राणी दुर्गावती कन्या शाळेने आपली यशाची परंपरा कायम राखण्यात यश मिळविले आहे.यामागे शाळेच्या शिक्षकांचे परिश्रम व शिक्षण विभागाने राबविलेल्या अनेक उपक्रमाचा फायदा असल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातून पहिल्या आलेल्या रोहिणी मुलमुले व पल्लवी किरमेचा सत्कार
By admin | Updated: June 9, 2015 02:10 IST