लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कवंडे गावालगत माओवादी व जवानांमध्ये सोमवारी चकमक उडाली. यावेळी जवानांनी माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. घनदाट जंगलाच्या आश्रयाने सर्व माओवादी पळून गेले.
सीमेलगत पेनगुंडा, नेलगुंडा व पाठोपाठ कवंडे या गावात चालू वर्षी पोलिस ठाणे उभारण्यात आले. त्यामुळे माओवाद्यांची कोंडी झाली. ९ मार्चला कवंडे येथे २४ तासांत पोलिस ठाण्याची निर्मिती केली होती. ११ मे रोजी कवंडे गावालगतच्या जंगलात काही माओवादी तळ ठोकून बसल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली. त्यानुसार सी- ६० च्या २०० जवानांनी अभियान राबविले. सोमवारी माओवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला, त्यास जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद्यांशी अधूनमधून गोळीबार झाला.
घटनास्थळावरून हे साहित्य केले जप्त
माओवादी पळून गेल्यानंतर परिसरातून दोन शस्त्रे जप्त केली. एक स्वयंचलित इन्सास आणि एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझिन, जिवंत काडतुसे, डेटोनेटर, एक रेडिओ, ३ पिथस, डब्ल्यूटी चार्जर आणि नक्षलवादी साहित्य आढळले. परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र केले आहे. माओवाद्यांचा मृतदेह आढळला नाही, पण ते जखमी किंवा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. नीलोत्पल, पोलिस अधीक्षक