वैरागड : आरमाेरी तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्याच्या सहा तालुक्यांतील १७० ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया १५ जानेवारीला पार पडली. आता चौकाचौकात जय-पराजयाची चर्चा रंगत असून ज्या वाॅर्डात चुरशीच्या लढती झाल्या. त्या ठिकाणी आपलाच उमेदवार विजयी होणार, असा दावा करीत समर्थकांची चर्चा रंगात आली आहे; पण मतदार आपल्या मताची कमाल दाखवणार आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रंगत हे लोकसभा, विधानसभा निवडणुकापेक्षा अधिक असते. त्याचा परिणाम तालुक्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी दर्शवते. वैरागड येथे सर्व मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या ते मतदान संपेपर्यंत रांगा कायम होत्या. आरमोरी तालुक्यातील मोहझरी, कुरंडी या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. इतर ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. आता जय- पराजयाच्या खमंग चर्चा चौकात, हॉटेल, पानटपरीवर जोरात सुरू आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आपला उमेदवार कसा निवडून येणार आहे, कोणत्या वाॅर्डात किती पैसा आणि दारू वाटली याची अपडेट माहिती खुलेआम देत आहे.
आता मतदार सुज्ञ झाला असून पैसा आणि चिवडा घेऊन आपले अमूल्य मत कोणाला विकत नाही, योग्य उमेदवाराची निवड करून गावाचा विकास व्हावा, अशी मतदारांची अपेक्षा असते. २२ तारखेला मतपेटीतून मतदारांचा कल व्यक्त होणार आहे. तोपर्यंत तरी जय- पराजयाच्या खमंग चर्चेने चांगलेच मनोरंजन होत आहे.